राहुल गांधी भर संसदेत भगवान शंकाराचा फोटो घेऊन का आले?

| Updated on: Jul 01, 2024 | 6:11 PM

काँग्रेस खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भगवान शंकराचा फोटो घेऊन आज संसदेत दाखल झाले. त्यांनी भगवान शंकराचा फोटो हातात घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. "सत्य, अहिंसा आणि धाडस हेच आमचं हत्यार आहे. शिवशंकाराचं त्रिशूळ हेच आमचं अहिंसेचं प्रतिक आहे", असं राहुल गांधी संसदेत म्हणाले.

राहुल गांधी भर संसदेत भगवान शंकाराचा फोटो घेऊन का आले?
काँग्रेस नेते राहुल गांधी
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 सरकारचं संसदेचं पहिलं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. या दरम्यान आजच्या दिवशी लोकसभेत चांगलीच खडाजंगी झालेली बघायला मिळाली. काँग्रेस खासदार तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भगवान शंकराचा फोटो घेऊन आज संसदेत दाखल झाले. त्यांनी भगवान शंकराचा फोटो हातात घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. “सत्य, अहिंसा आणि धाडस हेच आमचं हत्यार आहे. शिवशंकाराचं त्रिशूळ हेच आमचं अहिंसेचं प्रतिक आहे”, असं राहुल गांधी संसदेत म्हणाले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणावेळी लोकसभेत यावेळी कुरान आणि गुरु नानक यांचा देखील फोटो दाखवला. राहुल गांधी यांच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आक्षेप नोंदवला.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या आधी भगवान शंकराची मूर्ती दाखवली. त्यांच्या या कृतीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप नोंदवला. नियमांनुसार हे योग्य नाही, असं ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सुचित केलं. यानंतर राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरु केलं. “मी या फोटोच्या माध्यमातून काही सांगू इच्छितो. शिवशंकर यांच्यापासून कधीही निर्भय राहण्याची शक्ती मिळते. भगवान शंकाराकडून आपल्याला सत्यापासून कधीही मागे हटू नये, अशी प्रेरणा मिळते. भगवान शंकराच्या डाव्या हातातील त्रिशूळ हे अहिंसाचं प्रतीक आहे. हे त्रिशूळ जेव्हा उजव्या हातात असतं तेव्हा ते हिंसाचं प्रतीक असतं. सत्य, धाडस आणि अहिंसा हेच आमचं संबळ आहे”, असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

यावेळी सभागृहात गुरुनानक यांचा फोटो दाखवत राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. “शिवशंकर म्हणतात, घाबरु नका आणि घाबरवू नका. जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवतात, ते हिंदू नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या भाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला.

‘हिंदूंना हिंसक समाज म्हणणं चुकीचं’, पंतप्रधान मोदींची भूमिका

राहुल गांधी यांचं भाषण सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरुन उभे राहिले. त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. हिंदूंना हिंसक समाज म्हणणं चुकीचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील राहुल गांधी यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. “राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी. हिंसेला धर्मासोबत जोडणं चुकीचं आहे. राहुल यांना संपूर्ण देशाची माफी मागायला हवी”, असं अमित शाह म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील विरोधी पक्षाचे कान टोचले. “विरोधी पक्षनेत्याने सभागृहाची गरिमा राखली पाहिजे”, असं ओम बिर्ला म्हणाले. यानंतर पुन्हा राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरु केलं.