बॉर्डरवर पाकिस्तानची आता अतिशय घाणेरडी कुरापत; ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल
पाकिस्तान हा आपल्या शेजारचा देश आहे. मात्र तो कायमच भारताला शत्रू मानत आला आहे. भारतासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या पाकिस्तानची आणखी एक कुरापत समोर आली आहे.
![बॉर्डरवर पाकिस्तानची आता अतिशय घाणेरडी कुरापत; ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल बॉर्डरवर पाकिस्तानची आता अतिशय घाणेरडी कुरापत; ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pakistan.jpg?w=1280)
पाकिस्तान हा आपल्या शेजारचा देश आहे. मात्र तो कायमच भारताला शत्रू मानत आला आहे. भारतासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या दहशतवाद्यांना पोसायचं काम सुरुवातीपासूनच पाकिस्तान करत आला आहे. अनेकदा पाकिस्तानी सैनिक आणि भारताच्या सैनिकांमध्ये चकमकी झाल्या, मात्र प्रत्येक वेळी पळून जाण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली. पाकिस्तानकडून अनेकदा सीमावर्ती भागात हल्ला करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, मात्र त्यांना आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
सैन्यदल असेल, आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण, आर्थिक क्षेत्र अशा सर्वच बाबतीमध्ये भारत पाकिस्तानच्या तुलनेत कितीतरी पटीनं पुढे निघून गेला आहे. मात्र पाकिस्तानची अवस्था सध्या खूप बिकट झाली आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला असून, महागाईनं असमान गाठलं आहे. देशात सर्वत्र अशांतता असताना देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पीओकेमध्ये भीषण आग लागली आहे, मात्र आता या आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे. या आगीनं भारताच्या सीमावर्ती भागात असलेल्या जंगलाला देखील आपल्या कवेत घेतलं आहे.
आता असा आरोप करण्यात येत आहे की ही आग पाकिस्तानने मुद्दामहून लावली आहे. तसेच या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. भारतानं बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शत्रू राष्ट्रांची घुसखोरी रोखण्यासाठी जे दारूचे सुरुंग पेरले आहेत, त्यांचा स्फोट घडवून आणण्याचं यामागे पाकिस्तानचं कट -कारस्थान आहे, असं देखील बोललं जातं आहे. नियंत्रण रेषेच्या जवळ दीड ते दोन किलोमीटर परिसरात पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी भारताकडून सुरूंग लावण्यात आले आहेत. मात्र या सुरुंगामुळे आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात भारतीय सैन्याला देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही आग पीओकेमध्ये लागली आहे. मात्र हळूहळू ती भारताच्या सीमावर्ती भागात असलेल्या जंगलात देखील पसरू लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आगीवर वेळीच नियंत्रण न मिळाल्यास मोठ्य प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.