ओडीशा रेल्वे दुर्घटनेचे कारण समजले, जबाबदार लोकांची ओळख पटल्याचे रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण

ओडीशा बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या ठिकाणाचे बचाव कार्य काल पूर्ण झाले होते. रेल्वे ट्रॅकना पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवार सकाळपर्यंत रेल्वे मार्ग पूर्ववत होईल असे म्हटले जात आहे. अपघाताचे कारणही समजल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

ओडीशा रेल्वे दुर्घटनेचे कारण समजले, जबाबदार लोकांची ओळख पटल्याचे रेल्वेमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ashwini-vaishnaw
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 04, 2023 | 1:31 PM

दिल्ली : ओडीशाच्या बालोसोर ( Odisha Train Accident ) जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnaw ) यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दुर्घटना स्थळावर चालु असलेल्या दुरुस्ती कामाचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी यावेळी रेल्वे अपघाताच्या कारणांची देखील माहीती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अपघाताची चौकशी केल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातासाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटल्याचे त्यांनी सांगितले.

ओडीशाच्या ट्रेन अपघातात 288 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघातात तीन ट्रेनचा समावेश असून त्यात एक मालगाडीही आहे. रेल्वे मंत्र्यांनी आज पुन्हा घटनास्थळी भेट देऊन दुरुस्ती कामांचा आढावा घेतला. या ठिकाणचे बचाव कार्य कालच पूर्ण झाले होते. आज रेल्वे ट्रॅकना पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सर्व क्षतिग्रस्त डब्यातील मृतदेहांना काढण्यात आले असून हे डब्बे घटनास्थळावरुन हटविण्यात आले आहेत. या अपघाताला रेल्वेमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगमध्ये ( स्वयंचलित सिग्नल यंत्रणा ) केलेला बदल जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसला प्रथम पुढे जाण्याचा सिग्नल देण्यात आला आणि नंतर तो परत मागे घेण्यात आला. आता हा गोंधळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यात मानवी सहभाग होता, याचा तपास करण्यात आला आहे.

बुधवार सकाळपर्यंत रेल्वेमार्ग पूर्ववत

रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे की काल पंतप्रधानांनी केलेल्या सूचनेप्रमाणे वेगाने काम सुरू आहे. काल रात्री एक रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आहे. आज एक रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुधवार सकाळपर्यंत सर्व काम पूर्ण होईल असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील दुघर्टनास्थळी कालपासून हजर आहेत.

आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू

ओडीशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकानजिक शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 जणांचे प्राण गेले आहेत. 1175 जखमींना रुग्णालयात भरती केले गेले. त्यातील 793 जणांना घरी सोडण्यात आले. तर 382 जणांवर उपचार सुरू आहे, त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वेने मृतांच्या नातलगांना 10 लाख, गंभीर जखमींना दोन लाख आणि अन्य साधारण जखमींना पन्नास हजाराची मदत जाहीर केली आहे.