मारुती कंपनीने तब्बल 9925 कार परत मागवल्या
ज्या कार परत मागवण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या कार परत मागवल्याची माहिती कंपनीने वेबसाईटवर जाहीर केली आहे.

दिल्ली : देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीने तब्बल 9925 कार परत मागवल्या आहेत. या सर्व वाहनांना ब्रेक लागत नसल्याचा धोका व्यक्त केला जात आहे. ब्रेकच्या समस्यांमुळे कंपनीने या कार रिकॉल केल्या आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर या बाबातची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी देखील कपंनीने विविध कारणांमुळे आपल्या कार दुरुस्तीसाठी रिकॉल केल्या होत्या. कंपनीने जवळपास 10 हजार कार परत मागवल्या आहेत. यामध्ये वॅगन आर, सेलेरिओ आणि इग्निस या कारचा समावेश आहे. तीन हॅचबॅक कारच्या मागील ब्रेक असेंबली पिन भागामध्ये दोष असल्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.
या समस्येमुळे कार चालविताना जास्त आवाज येतो. कारच्या ब्रेकची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. या दोषामुळे कंपनीने गाड्या परत मागवल्या आहेत.
कंपनीने सर्वच वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निस परत मागविलेल्या नाहीत. 3 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या काळात या सर्व कारचे मॅन्युफॅक्चरींग झाले होते.
ज्या कार परत मागवण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या कार परत मागवल्याची माहिती कंपनीने वेबसाईटवर जाहीर केली आहे.
कंपनीच्या सर्व सर्व्हिस सेंटरवर सदोष पार्ट दुरुस्त करण्यासाठी नवीन पार्ट्स उपलब्ध करून दिले जात आहेत. कंपनीच्या वतीने ग्राहकांशी संपर्क साधला जात आहे. कंपनीमार्फत मोफत दुरुस्ती करून दिली जात आहे.