मोबाईलमुळे तरूणांचं लग्न रखडलं, कोणी मुलगीच देईना… ‘या’ गावात अजब समस्या
नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते. त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात कमवायला गेली आहेत.

मोबाईलमुळे नवरा-बायकोच्या नात्यात वितुष्ट आल्याची, वाद झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्याच देशात एक असं गाव आहे, जिथे मोबाईलमुळे तरूणांचं लग्नच होत नाहीये. उत्तर प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई ब्लॉकमधील नायगावचा हा भाग आहे. नायगाव हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारे वनगाव आहे. येथे अविवाहित मुलांची संख्या वाढत आहे. आपल्या मुलीचे या गावातील तरूणांशी लग्न लावून द्यायला कोणीच तयार नाही. त्याचे कारण म्हणजे मोबाईल नेटवर्कचा अभाव.
2025 साली टेक्नॉलॉजीमध्ये एवढे बदल झालेत, जग एवढं पुढे गेलं आहे तरी भारतातल्या या नायगावमध्ये कोणत्याही दूरसंचार कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नाही. लोकांकडे मोबाईल आहेत पण बोलण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर दूर जावे लागते, तरच फोनवर बोलता येते. त्यामुळे गावातील काही मुलं नागपूर, महाराष्ट्रात पैसे कमवायला बाहेर पडली आहेत.
तरूणांचा लग्न रखडलं
या गावातील रहिवासी श्यामाबाई त्यांच्या 29 वर्षांच्या मुलाच्या लग्नामुळे चिंतेत आहेत. खूप त्रास होतो. कोणीच आम्हाला मुलगी देत नाही. येथे नेटवर्क उपलब्ध नसल्याची मुलीच्या कुटुंबियांना चिंता असते. फोन लागत नाही. माझ्या दोन मुलांची तर लग्न झाली, पण धाकटा मुलगा आता 29 वर्षांचा झाला तरी त्याचं लग्न जुळेना. त्याच्या लग्नात बऱ्याच अडचणी येत आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे कोणीच त्यांच्या मुलीची आमच्याशी सोयरीक करायला तयटार नाही, अशी समस्या श्यामाबाई यांनी सांगितली.
त्याच गावातील दुलम सिंग कुंजम यांचीही तीच तक्रार आहे. इंटरनेट कनेक्शन नाही, त्यामुळे कोणीही मुलगी देऊ इच्छित नाही. ही समस्या प्रत्येकाला सतावत आहे. आम्ही लग्नासाठी मुलगी शोधत आहोत, पण कोणीच या गावात मुलगी द्यायला तयार नाही. आम्ही आमच्या मुलीशी कसे बोलणार? प्रत्येक पालकांचा हा सवाल आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रसूतीच्या वेळी रुग्णवाहिका बोलावण्यासाठीही लांब जावे लागते.
‘रिचार्ज तर होतं पण फोन वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर करावी लागते तंगडतोड
नेटवर्क नसल्यामुळे गावातील तरुण सर्वाधिक संतप्त आणि नाराज आहेत. 29 वर्षीय चैतालाल उईके यांच्या सांगण्यानुसार, गावात इथे नेटवर्क नाही आणि आजच्या काळात मोबाईलशिवाय आयुष्य चालू शकत नाही. सर्वत्र नेटवर्क असावे. मोबाईल रिचार्ज करतो आम्ही पण तो वापरण्यासाठी दोन -दोन किलोमीटर तंगडतोड करावी लागते. मुलंही ऑनलाईन शिकू शकत नाहीत. एखाद्याला इमरजन्सीमध्ये आमच्याशी बोलण्याची गरज भासली, कुणाचा मृत्यू झाला तरी इथे फोन येणार नाही. लोक तक्रार करतात, तेव्हा ते (अधिकाी) म्हणतात की हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गाव असेल तर नेटवर्तक येऊ शकणार नाही. बांधकाम होऊ शकणार नाही. ते बांधले जाणार नाही.
बीएसएनएल कडून लावण्यात येणार टॉवर
सुमारे 650 लोकसंख्या असलेल्या या गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षकांचे काम रखडते. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत कव्हरेज नसलेल्या गावांसाठी बीएसएनएल टॉवर्स बसवत आहे. काही दिवसांपूर्वी चार गावांमध्ये टॉवर बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात या गावाचे नाव येऊ शकते, असे त्यांनी नमूद केलं.