
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वार्याचे, गुज पावसाचे... का होते बेभान कसे गहिवरते...., असे अप्रतिम शब्द लिहिणारे गीतकार गुरु ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे.

गीतकार गुरु ठाकूर यांची गाणी ऐकली की मंत्रमुग्ध व्हायला होतं. गुरु कविता अनेकांना आवडतात. पण एखादी कविता किंवा गाणी सुचण्याची प्रक्रिया कशी असते? याबाबत गुरु ठाकूर यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

कविता लिहिणं वेगळं आहे. सुरुवातीला मी कविता लिहायचो मग त्याचं गाणं व्हायचं. पण आता आधी चाल ऐकतो. त्यानंतर एक हुक लाईन मिळाली की मग पुढचं गाणं तयार होतं, असं गुरु ठाकूर यांनी सांगितलं आहे.

गुरु ठाकूर हे गीतकार आणि कवी आहेत. शिवाय ते उत्तम चित्रकार आहेत. ते छान चित्र रेखाटतात. याशिवाय गुरु ठाकूर यांची फोटोग्राफी देखील उत्तम आहे. निसर्गाचं सौंदर्य ते कॅमेऱ्यात कैद करत असतात.

गुरु ठाकूर यांनी एकाहून एक अप्रतिम गाणी सिनेसृष्टीला दिली आहेत. अप्सरा आली, वाजले की बारा या त्यांनी लिहिलेल्या लावणी प्रेक्षकांना भावतात. खेळ मांडला, चांगभलं रे देवा ही गाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करतात.