
म्हणून बेदाणा निर्मितीचा निर्णय : यंदा सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे गणितच बिघडले आहे. द्राक्ष बागांमधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघालेला नाही. शिवाय द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री पेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला आहे.

हंगाम संपल्यानंतरही नुकसान सुरुच : सध्या द्राक्ष तोडणी पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात बेदाणा निर्मितीचे प्रोजेक्ट हे सुरु आहेत. बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेऊन आता ही प्रक्रिया सुरु असतानाच पावासाने लावलेली हजेरी ही नुकसानीची आहे. त्यामुळे हंगाम संपला तरी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

पोषक वातावरणही नाही : बेदाणा निर्मितीसाठी कोरडे वातावरण आणि उन्ह असणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांपासून ज्या भागात बेदाणा निर्मिती होत आहे त्याच भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि आता बेदाण्याचे नुकसान होत आहे.

महिला मजूरही जखमी: कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी येथे बेदाणा निर्मिती केली जात होती. पण सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेडवरील पत्रे तर उडून गेलेच पण यामध्ये महिला मजूर यादेखील जखमी झाल्या. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेड मालकांनी केली आहे.