पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन, ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याने मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प ( ३ टप्पा ) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवारी झाले.
विधानसभा निवडणूकाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगाव नेस्को येथील कार्यक्रमात सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यात महत्वाकांक्षी ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगद्यांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बोगद्यांमुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी टळून ठाण्यातून बोरीवलीला अर्ध्या तासांत पोहचता येणार आहे. सीएसएमटी येथील 10 आणि 11 फलाटांच्या लांबी वाढविल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांचे डबे वाढणार आहे.त्यामुळे जादा प्रवाशांची सोय होणार आहे.
जुळा बोगदा प्रकल्पाविषयी माहिती
• गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा.
* जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर.
* हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल असेल.
* प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील.
* सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याचे काम टीबीएम मशिनने होणार
• बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुव्हीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश असणार आहे
* पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था असणार आहे
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार आणि तुळशी तलावांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार आहे.
• प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्याची गरज नाही.
* प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती होणार
* कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांची घट होणार
* मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनात बचत होणार.
• जुळा बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च- ६३०१ कोटी रुपये.
• जुळा बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी- ऑक्टोबर २०२८ पर्यंत.
• प्रकल्पाची सद्यस्थिती: एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर.
• बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला + २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला + ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाविषयी माहिती
* गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग ( जीएमएलआर ) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित.
• प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किलोमीटर.
* संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च.
* पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे (आरओबी) रुंदीकरण.
* दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण.
• टप्पा ३ ( अ ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम.
* टप्पा ३ ( ब ) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका (३ बाय ३) असलेला पेटी बोगदा (कट अँड कव्हर) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा.
• चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाकापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भूयारी मार्ग (व्हीयूपी) या कामांचा समावेश.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे फायदे
• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा.
• या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा.
• या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार.
• नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे
• जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे
• गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल.
• इंधन वापरात बचत, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही ( AIQ ) सुधारणा होईल.