Chandrakant Handore : क्रॉस वोटिंग केलं त्यांच्यावर नाराज, कारवाई झाली नाही तर निर्णय घेऊ, चंद्रकांत हंडोरेंचा स्वकियांना इशारा
माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. हंडोरे हे ज्या भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेचं चेंबूरमध्ये चिंतन शिबिर पार पडत आहे. त्यावेळी हंडोरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला, तर काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. महत्वाची बाब म्हणजे भाजपकडे आपला पाचवा उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यासाठी एकही मत शिल्लक नसताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाड यांना निवडून आणलं. महाविकास आघाडीचं मतं फोडण्यात भाजपला राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतही मोठं यश आलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबईचे प्रभारी, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. हंडोरे हे ज्या भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेचं चेंबूरमध्ये चिंतन शिबिर पार पडत आहे. त्यावेळी हंडोरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसातल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर हे चिंतन शिबिर होत आहे. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष आहे. त्या पार्श्वभूमीवर या चिंतन बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. आपण आणि आपले कार्यकर्ते ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर नाराज आहोत, कारवाई झाली नाही तर निर्णय घेऊ, असा इशाराच हंडोरे यांनी स्वपक्षीयांना दिलाय.
चंडोरेंना पराभवाचा धक्का कसा बसला?
विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक फटका बसलरा तो राज्यातील काँग्रेस पक्षाला. सत्तेत असणाऱ्या या पक्षाकडे 44 आमदारांचे स्वत:चे संख्याबळ असतानाही, पहिल्या फेरीत एक उमेदवार सरळपणे निवडून आणता आला नाही. पहिल्या फेरीअखेरीस काँग्रेसचे दोन्ही उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांच्यापैकी एकालाही 46 मतांचा कोटा पूर्ण करता आला नव्हता. हंडोरेंना पहिल्या फेरीच्या अखेरीस 22 मते फडली होती, तर भाई जगताप यांना केवळ 20 मते पडलेली होती. त्यामुळे पक्षाची पूर्ण 44 मतेही पहिल्या पसंतीच्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली नाही, हे स्पष्ट झालं. शिवसेनेची तीन मते काँग्रेसला मिळणार होती, ती मिळाली असल्यास काँग्रेसची पाच मते फुटल्याची शक्यता आहे.
काँग्रेसने पहिल्या पसंतीचा क्रम चंद्रकांत हंडोरेंना दिला होता. म्हणजे त्यांचा या निवडमुकीतील विजय निश्चित मानण्यात येत होता. मात्र आमदारांनी हा क्रम मतदानात पाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसऱ्या पसंतीची मतेही चंद्रकांत हंडोरेंना मिळाली नाहीत हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालं.