OBC Reservation : भुजबळ, वडेट्टीवार हार तुरे घ्या, मात्र लोकांशी खोटं बोलू नका, नाशिकच्या बालेकिल्ल्यात बावनकुळे गरजले
नवं सरकार येतात शिंदे आणि फंडणवीस यांच्या प्रयत्नाने अहवाल टेबल झाला आणि त्यानंतर आरक्षण मिळालं असा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे आता दोन्ही बाजूने वार पलटवार सुरू आहेत.

नाशिक : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ओबीसी समाजाला (OBC Reservation) मोठा दिलासा दिला. कारण आगामी निवडणुका (Election 2022) या ओबीसी आरक्षणासह घ्या, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या श्रेयवादाची राजकीय लढाई सुरू झाली आहे. त्यामध्ये आमच्याच काळात आयोग स्थापन झाला. आमच्याच काळात आम्ही माहिती गोळा केली. त्यामुळे आरक्षण मिळालं असा दावा महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. तर नवं सरकार येतात शिंदे आणि फंडणवीस यांच्या प्रयत्नाने अहवाल टेबल झाला आणि त्यानंतर आरक्षण मिळालं असा दावा भाजप नेते करत आहेत. त्यामुळे आता दोन्ही बाजूने वार पलटवार सुरू आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांना आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना जोरदार टोला लगावला आहे. भाजप ओबीसी मुळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक मध्ये छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून बोलत होते. तिथून त्यांनी भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी हार तुरे घ्यावेत. मात्र लोकांशी खोटं बोलू नये असा टोला त्यांनी लगावलेला आहे. आयोगाचे काम बंद पडले तरी चालेल मात्र आयोगाला पैसे द्यायचे नाहीत, हे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी ठरवलं होतं, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा रखडलेला अशी टीकाही बावनकुळे यांनी केलेली आहे.
ठाकरे सरकारने काही काम केलं नाही
ओबीसींसाठी आम्ही जेलमध्ये गेलो. आम्ही आंदोलन केली. छगन भुजबळ यांनी त्यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी नाशिक मधून केला आहे. सरकारमध्ये असताना कार्यकर्त्यांचा मोर्चा काढायला सांगितला, असेही ते म्हणाले आहेत. तसेच आडनावावरून ओबीसी आरक्षणाची जनगणना करण्यास आम्ही विरोध केला. घरोघरी जाऊन लोकसंख्या मोजावी लागेल हे आम्ही ठणकावून सांगितलं, मध्य प्रदेश सरकारने हे काम तीन महिन्यात पूर्ण केलं. मात्र उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या सरकारने काही काम केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दोन वर्षे आयोगाच्या रिपोर्टला हात लावला नसता
तर बांठिया आयोगाचा रिपोर्ट आघाडी सरकारने तयार केलेला नाही. असा थेट हल्लाबोल बावनकुळे यांनी चढवलेला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार आले नसते तर ओबीसी आरक्षण मिळाले नसते, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पुढील दोन वर्ष ही बांठिया आयोगाच्या रिपोर्टला हात लावला नसता. मंडल आयोगानंतर ओबीसी समाजाला नरेंद्र मोदींनीच न्याय दिला. मागील अडीच वर्षात आपण जो संघर्ष केला, त्यामुळे हा न्याय मिळाला, अशी हाक बावनकुळे यांनी नाशिक मधून दिली आहे. त्यामुळे आता यावर छान भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांचाही जोरदार पलटवार होण्याची शक्यता आहे.