Marathi News Politics Devendra Fadnavis criticizes Shiv Sena and Uddhav Thackeray over Babri Masjid case Warning to expose corruption in Mumbai Municipal Corporation
Devendra Fadnavis : ‘भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा, असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: TV9
मुंबई : एकीकडे राज ठाकरे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरील वार सुरुच आहेत. आज मुंबईत सोमय्या मैदानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपची बुस्टर सभा घेतली. त्यावेळी बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली, काय विनोद आहे. बाबरी पाडल्याबद्दल ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा, असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचा अतिशय आभारी आहे.
मुंबईकरांना भ्रष्टाचाऱ्यांच्या जोखडातून बाहेर काढणे, त्यांना त्यांची मुंबई सुपूर्द करणे, हेच आपले ध्येय आहे, हाच आपला पुढचा संघर्ष असणार आहे.#Maharashtra#BJPpic.twitter.com/xwj4EfzBWE
फडणवीस पुढे म्हणाले की, बाबरी पाडल्याच्या 32 आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, स्व. कल्याणसिंग, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभागसिंग पवैया, आचार्य धर्मेंद्र जी यांची नावे होती, असंही फडणवीस म्हणाले. हनुमान चालिसा आता राजद्रोह होतो. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे? हनुमान चालिसाने केवळ रावणाचे सरकार उलथवले जाते, रामाचे नाही. आता सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या? असा सवालही फडणवीस यांनी शिवसेनेला केलाय. या देशात एक वाघ तयार झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या रूपाने, ज्यांनी कलम 370 रद्द करून दाखविले. आता शिवसेना म्हणते, तुम्ही पाकिस्तानबद्दल काय बोलता, चीनबाबत बोला ना. काय अवस्था झाली शिवसेनेची? असा खोचक सवालही फडणवीस यांनी यावेळी केलाय.
‘राज्यात आणीबाणीची अवस्था आणून ठेवली’
आज पत्रकारांवर हल्ले कारवाया सुरु आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह अन्य नेत्यांवर हल्ले झाले. माध्यमांवर किती बंधने? आणीबाणीची अवस्था आणून ठेवली या महाविकास आघाडी सरकारने. मुख्यमंत्र्यांची आजची मुलाखत म्हणजे पुन्हा तेच टोमणे. दंतकथा, धक्का, पाठीत वार, खेळ, मार्केटिंग, भोंगे-पुंगी, माकडचाळे, बेडुकउड्या, पोटदुखी, बुद्धीबळ, चिरडणे, लढणे, मरणे, रडणे, पीडित, चाटण, बागुलबुवा, हात तोडणे, तमाशे, पोळी, बोंबा, नौटंकी. आज महाराष्ट्र दिनी सरकार कुठला निर्णय घेईल असं वाटलं होतं, पण ही अपेक्षा फोल ठरली, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केलीय.
महाविकास आघाडी सरकारने मदत कुणाला केली? बिल्डर, दारु दुकानदार, विदेशी मद्यपिंना. बारा बलुतेदारांना काहीच नाही.
मुख्यमंत्र्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते. आता सरकारचे ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरू आहे. आता मुख्यमंत्री म्हणतात तुटून पडा. पण, लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही. पोलिसांच्या बळावर हल्ले काय करता? आम्ही घाबरणार नाही. तुटून पडण्याची खुमखुमी, चला तुम्हाला आव्हान देतो… जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर, किती दिवस तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर!, असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
कवितेच्या माध्यमातून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
आला कोरोना, घर भरोना हीच तुमची नीती ठरली,
यशवंत म्हणतो मी तर माझ्या मातोश्रींचीच झोळी भरली.
कुणी घडीवर कुणी माडीवर, कोट्यवधींचाच वाढला वावर.
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर!
कोरोनाच्या लाटेत करोडोचे भरले गल्ले,
मरणार्यांचे टाहो मात्र तुमच्या कानी नाही पडले!
ताव मारत राहिला तुम्ही कोविड सेंटरच्या मलाईवर,
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर!
अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मंत्रालयही पडले ओस,
नातेवाईकांच्या हिताची काही जणांना भारी हौस.
शेतकरी आणि कष्टकरी सोडला तुम्ही वार्यावर,
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर!
लोडशेडिंगने वाजले बारा,
वीजबिल वसुलीचा तुघलकी फेरा.
उभं शिवार जळतंय पाण्यावाचून घोटभर,
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर.
संपामुळे तीन महिने, बंद पडली लालपरी,
हजारो कर्मचार्यांची वाळून गेली शिदोरी.
तरीही फरक नाही पडला तुमच्या मंत्री परबांवर,
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर.
तुमच्या नाकर्तेणामुळे गेले ओबीसी आरक्षण,
वर्षे झालं तरी तुमचं सुरू आहे फक्त सर्वेक्षण.
वंचित ओबीसी बांधव उपेक्षित आहे राज्यभर,
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर.
दलित, आदिवासींच्या प्रश्नाकडे तुमचा कायम कानाडोळा,
खावटी अनुदान योजनाही उडवून गेला तुमचा कावळा.
जमलंच तर लक्ष द्या कुपोषितांच्या पोषणावर,
जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचार्यांच्या टोळीवर.
मुंबई महापालिका निवडणुसाठी फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबईची निवडणूक का महत्वाची? तर मुंबईची निवडणूक सत्तेसाठी नाही तर आपल्याला मुंबईकरांसाठी संघर्ष करायचा आहे. मुंबईकरांना त्यांची मुंबई पुन्हा सोपविणे हेच आपले ध्येय आणि हाच आपला संघर्ष असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.