Maharashtra politics : राज साहेबांसोबत द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांबद्दल किंचितही सहानुभूती नाही; खोपकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या बाजुने एक सहानुभूतीची लाट निर्माण होताना दिसत आहे. मात्र राजसाहेब यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल किंचित देखील सहानुभूती वाटत नसल्याचे खोपकर यांनी म्हटले आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून बहुमत सिद्ध करण्याचे आवाहान केले होते. आज बहुमत चाचणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यापूर्वी राज्यातील जनतेशी भावनिक संवाद साधला. या संवादानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजुने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभरातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे. मात्र दुसरीकडे राजसाहेब (Raj Thackeray)यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्रा सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नसल्याचे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हटलंय खोपकर यांनी?
अमेय खोपकर यांनी ट्विट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘प्रत्येक प्रसंगात मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचं नुकसान करणाऱ्या, राजसाहेबांची माणसं फोडणाऱ्या, राजसाहेब यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही’ असं ट्विट खोपकर यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी देखील त्यांनी अनेकवेळा विविध विषयांवरून शिवसेनेवर टीका केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 29, 2022
भाजपाच्या जल्लोषावर बंडखोर नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष सुरू असल्याचे दिसून येत आहे. ऐकोमेंकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. मात्र या जल्लोषावर बंडखोर आमदारांनी आक्षेप घेतला आहे. आमची लढाई आमच्या पक्षप्रमुखांच्या विरोधात नव्हती. विचारांसाठी होती. सत्तेसाठी आम्ही बंड केले नाही. त्यामुळे या पद्धतीचा जल्लोष चुकीचा आहे. काहीही झाले तरी उद्धव ठाकरे दुखवता कामा नये, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी ‘टीव्ही9’ बोलताना म्हटले आहे. तसेच प्रतिक्रिया देताना केवळ प्रवक्त्यांनीच प्रतिक्रिया द्याव्यात असे देखील त्यांनी म्हटले आहे. सत्तास्थापनेबाबतचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच घेतील असेही यावेळी केसरकर यांनी म्हटले आहे.