पनवेलमध्ये शेकापला खिंडार, पाच नगरसेवक भाजपमध्ये

हरीश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली.

पनवेलमध्ये शेकापला खिंडार, पाच नगरसेवक भाजपमध्ये
| Updated on: Aug 21, 2020 | 3:12 PM

पनवेल : रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं थोडंफार अस्तित्व असलेल्या भागातच राजकीय भूकंप झाला आहे. पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शेकापचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. (Panvel Five Workers and Peasants Party aka SheKaPa Corporators enters BJP)

पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः खिंडार पडले आहे. भाजप कार्यालयात दुपारी पाच नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. माजी पालमंत्री रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी उपस्थित राहणार आहेत.

पनवेल महापालिकेत शेकापचे 23 नगरसेवक आहेत. यातील चौघा जणांनी आधीच शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

दरम्यान, हरीश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली. शेकापमध्ये पैसेवाल्याना पदे दिली जात असून फक्त कॉन्ट्रॅकरनाच न्याय दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक हरीश केणी यांनी केला.

शेकापकडून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात त्यांनी चांगलीच लढत दिली होती. निवडणुकीत पक्षाकडून अनेक आश्वासने दिली गेली, मात्र पक्ष नेतृत्वाने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले. फक्त पैसेवाल्याना न्याय दिला, अशा शब्दात शेकाप नेते जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर हरीश केणी यांनी टीका केली.