सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही, सत्ता जेव्हा येते तेव्हाच ती जायला लागते; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? पाहा…

| Updated on: Aug 19, 2023 | 1:50 PM

Raj Thackeray on Indian Politics : विरोधीपक्ष कधी जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतो; राज ठाकरे यांनी राजकारणातील कटू सत्य सांगितलं. सत्ता हाती येण्यावर आणि जाण्यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. पाहा काय म्हणाले...

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही, सत्ता जेव्हा येते तेव्हाच ती जायला लागते; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? पाहा...
Follow us on

पिंपरी चिंचवड | 10 ऑगस्ट 2023 : पिंपरी चिंचवडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमात पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पत्रकारिता आणि सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही. सत्ता जेव्हा हातात येते. तेव्हाच ती हातातून निसटायला लागते. जायला लागते, असं राज ठाकरे म्हणालेत. निवडणुका त्यांचे निकाल आणि हार जीत यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलंय.

राज यांनी सभांना होणारी गर्दी आणि त्याचं मतांमध्ये होणारं रुपांतर यावर भाष्य केलं. तेव्हा त्यांनी देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचं उदाहरण दिलं. सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सध्याची देशभरातील पत्रकारितेची परिस्थिती कशी आहे, हे पाहता आत्ता पुरस्कार देताना मला जाणवलं की, आजही पत्रकारिता जिवंत आहे. म्हणूनच मी आज मनसे अध्यक्ष म्हणून नव्हे तर पत्रकार राज ठाकरे म्हणून उपस्थित आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पत्रकार मला म्हणतात, तुमच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. मला सांगा, 2009 ते आज वर माझ्या उमेदवारांना मतं कुठून मिळतात. काय रतन खत्रीने आकडे काढले होते का? सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो. सत्ता हातात आली की ते जायला सुरू होते. विरोधी कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हारत असतो. आता तुम्ही पत्रकार आहात, म्हणजे तुम्ही काय आमचे वाभाडे काढणार का? राज ठाकरे आहे मी, हे मी खपवून घेणार नाही. मी यावर व्यक्त होणारच, असं राज ठाकरे म्हणाले.

ब्लू प्रिंट त्याचंच एक जिवंत उदाहरण. मी ती सादर केली त्यानंतर कोणी ती ब्लू प्रिंट पाहिली नाही. फक्त मला हिणवलं गेलं. कोणी तरी सुपारी दिली की हे पत्रकार मला येऊन विचारणार. आता मला सांगा पत्रकार हल्ला ठीक आहे, तुमच्यावर हल्ला झाला की जसं वाईट वाटतं, तसंच आम्हाला ही वाटतं. तुमचं काम आमचे डोळे उघडणे, समाजाला दिशा दाखवणे, प्रबोधन करणे हे आहे, असंही त्यांनी म्हटलं

पण जाणीवपूर्वक काहीही ठरवून बातम्या देणे हे तुमचं काम नाही. पत्रकारांना काही बोललं की त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटतं, मग राज ठाकरेंबाबत काही बोलल्यावर त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाटत नसेल का? म्हणजे तुमचं ते कुटुंब अन आमचं काय? याचं भान पत्रकारांनी ठेवायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले.