शेतकरी आत्महत्येस सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार : राधाकृष्ण विखे
शेतकरी आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची फसवी घोषणा जबाबदार असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

अहमदनगर : जिल्हयातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची फसवी घोषणा जबाबदार असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी केली (Radhakrishna Vikhe on Farmer Suicide). यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. तसेच ठाकरे सरकारला लोकांच्या प्रश्नांपेक्षा सत्ता टिकवण्याचीच अधिक चिंता असल्याचा आरोप केला.
राधाकृष्ण विखे म्हणाले, “शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. ठाकरे सरकारला लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारची सत्ता टिकवण्याची चिंता वाटत आहे. आघाडी सरकारचं हे राजकारण जनता बघत आहे.”
एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, तर दुसरीकडे कर्जबाजाराला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यातून राज्य सरकारच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज्य सरकारकडून कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, तरीही आत्महत्या होत असल्याने नेमकं कुठं चुकतंय याचा आम्ही नक्कीच विचार करू. पाथर्डी येथील मल्हार बटुळे यांची आत्महत्या दुर्दैवी आहे.”
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “ही घटना अतिशय दुर्दैवी आणि ह्रदयद्रावक आहे. आपण शेतकऱ्यांना दोन प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. जवळपास 70 टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. कुटुंबीयांच्या दुःखाबाबत मी सहवेदना व्यक्त करतो. या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करु.”
Radhakrishna Vikhe on Farmer Suicide