आणि मी एकदाच पळून गेलो… राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?; आयुष्यात कुणाला घाबरले?

| Updated on: Jun 29, 2024 | 6:14 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमेरिकेतील सॅन होजेला आले होते. या ठिकाणी बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. राज ठाकरे यांच्याशी कला, साहित्य, राजकारण आणि मनोरंजन विश्वाविषयीच्या मनसोक्त गप्पा मारण्यात आल्या. राज यांनीही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

आणि मी एकदाच पळून गेलो... राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?; आयुष्यात कुणाला घाबरले?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे अत्यंत कडक राजकारणी, अँग्री यंग व्यक्तीमत्व. रोखठोक बोलणारे राजकारणी. कुठलाही आडपडदा न ठेवता, कुणाचाही मुलाहिजा न बाळगता सडेतोड मते व्यक्त करणारा राजकारणी अशी राज ठाकरे यांची प्रतिमा आहे. कुणालाही अंगावर घेणारा डॅशिंग नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. त्यामुळे देशभर राज ठाकरे यांच्या नावाचा दरारा जाणवतो. पण कुणाचीही भीडभाड न ठेवणारे राज ठाकरे मात्र आयुष्यात एका प्रसंगात घाबरले होते. नुसतेच घाबरले नव्हते तर त्यावेळी पळूनही गेले होते. अमेरिकेत एका कार्यक्रमाला आलेले असताना राज ठाकरे यांनी हा किस्सा सांगितला.

अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी हा किस्सा ऐकवला. तुम्ही आयुष्यात कधीच कुणाला घाबरत नाही. रोखठोक बोलता. पण तुम्ही कधी आयुष्यात कुणाला घाबरला का? हा प्रश्न येताच राज ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं. घाबरलोय. पण पळून जाण्याची वेळ आली नाही. आईला घाबरलोय. माझ्या आईला आणि माझ्या मुलांच्या आईला मी घाबरलोय. मला अनेकजण विचारतात तुमचा कडक स्वभावही आहे आणि मृदू स्वभावही आहे. आता मला सांगा एखादा डाकू हनिमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून जाणार आहे का? तिकडे थोडा वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी करत नाही. मी फक्त उदहारण दिलं, असं राज ठाकरे यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

31 डिसेंबरच्या रात्रीचा प्रसंग

तुम्हाला कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगातून पळून जाण्याचा प्रसंग आला का? असा सवालही राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी लग्नापूर्वीचा एक किस्सा सांगितला. ती लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. 31 डिसेंबरला आम्ही बाहेरगावी गेलो. तिच्या वडिलांना माहीत नव्हतं आमचं जमलं ते. रात्री 2 अडीच वाजता मी शर्मिलाला घरी सोडाला गेलो. तेव्हा गॅलरीत मला कुणी तरी फिरताना दिसलं. हिने सांगितलं राजा निघ, बाबा आहेत. 31 डिसेंबरची पहाट होती. मी म्हणालो, बाबा नाही, वाचमन आहे. ती म्हणाली, निघ आता बाबा आहेत. जेव्हा मला ते दिसले. तेव्हा मी एकदाच तिथून पळून गेलो होतो. तेवढंच, असं राज यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

राज यांची पोस्ट जशीच्या तशी

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या कार्यक्रमाचं स्वरुप आणि त्यांच्या मनातील भावना त्यांनी त्यात व्यक्त केल्या आहेत.

आज मुलाखतीच्या निमित्ताने मुलाखतकारांनी अनेक प्रश्न विचारले, प्रेक्षागृहातील उपस्थित प्रेक्षकांच्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरं देता आली. यातून त्यांना मी एकूणच राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा विषयांकडे कसं बघतो, हे त्यांना कदाचित पुन्हा एकदा नव्याने समजलं असेल. पण माझ्या तिथे जमलेल्या मराठी जनांकडून पण काय अपेक्षा आहेत, हे देखील मी प्रांजळपणे मुलाखती दरम्यान मांडलं.

आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं भारताबाहेर आहेत, तिथे त्यांनी त्यांचं एक जग उभं केलं, ते तिथे यशस्वी झालेत, या सगळ्या प्रवासात त्यांनी जो अनुभव गोळा केला असेल, जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्या त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल , तर त्या त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत, आणि हे करताना महाराष्ट्रात त्यांनी या राज ठाकरेला गृहीत धरलंत तरी चालेल असं मी आवर्जून सांगितलं.

बाकी आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे २ मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि ‘मराठी’ म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत हे मी मुलाखतीत सांगितलं.