सांगा काजोलचं काय चुकलं?; सामना अग्रलेखातून ‘त्या’ वक्तव्याला दुजोरा

| Updated on: Jul 11, 2023 | 8:02 AM

Saamana Editorial on Bollywood Actress Kajol Statement : काजोलच्या 'त्या' वक्तव्यावर सामनातून भाष्य; म्हणाले, तिचं काय चुकलं?

सांगा काजोलचं काय चुकलं?; सामना अग्रलेखातून त्या वक्तव्याला दुजोरा
Follow us on

मुंबई : बॉलिवूड कलाकार राजकारणावर फार उघडपणे बोलताना दिसत नाहीत. पण काही कलाकार परखडपणे राजकीय, सामाजिक परिस्थितीवर आपली मतं मांडतात. बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकीय नेते भारत देश चालवत आहेत, असं काजोल म्हणाली. तिच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आजच्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. तेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यापीठाच्या आवारात जाऊन काही क्षण तेथे ‘मौन’ उभी राहिली. तिने भाषण केले नाही, पण दीपिकाचे मौन हा संस्कार व शिक्षणाचा प्रभाव होता , पण त्यानंतर दीपिकावर झालेले असभ्य हल्ले , तिच्या चित्रपटांवरील बहिष्कार हे अज्ञान , अंधकारात देश चाचपडत असल्याचे लक्षण होते . आता देशाच्या शहाणपणावर प्रश्न निर्माण केल्याने अभिनेत्री काजोलही असभ्य , अज्ञानी लोकांच्या निशाण्यावर आली . या देशात सध्या शिक्षणावर बोलण्याची सोय राहिलेली नाही . धर्माचा गांजा ओढून शिक्षितही अंधभक्त बनले आहेत . त्यावर उपाय काय ? काजोलने अंधभक्तांच्या डोळय़ांत ज्ञानाचे काजळ घातले खरे , पण तरीही भक्त आंधळेच राहिले !

देशाचे सध्याचे राजकारण म्हणजे अडाण्यांचा गाडा झाला आहे व त्यावरच अभिनेत्री काजोलने आपले परखड मत व्यक्त केले. शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने म्हटले. आपल्या देशातील अंधभक्तांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अंधभक्तांनी असा समज करून घेतला की, काजोलने सध्याच्या दिल्ली सरकारवर आपले मत व्यक्त केले व त्यांनी काजोलला नेहमीप्रमाणे ‘ट्रोल’ करण्यास सुरुवात केली. आपल्या देशातील एक उच्चशिक्षित कलाकार लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगते व तसे केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या ‘ट्रोल धाडी’ त्या अभिनेत्रीवर तुटून पडतात.

देशात वैचारिक बदलांची प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे. कारण शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकारणी देश चालवत आहेत, असे काजोलने सांगितले. काजोलचे मत हे अनेकांच्या डोळय़ात अंजन घालणारे आहे. ती म्हणते, ”आपण अजूनही परंपरा आणि जुन्या विचारधारेत अडकून पडलो आहोत. याचे कारण अर्थातच शिक्षणाचा अभाव हेच आहे.

देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते. विविध दृष्टिकोनातून पाहण्याची संधी तुम्हाला शिक्षणामुळेच मिळते,” असे काजोलने सांगितले. यात तिचे काय चुकले? पण चौथी पास राजाचे अंधभक्त, समर्थक काजोलवर तुटून पडले. काजोल महाराष्ट्रकन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच. पुन्हा शिक्षणासंदर्भात विचार देणारे महात्मा फुले याच मातीतले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. तेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यापीठाच्या आवारात जाऊन काही क्षण तेथे ‘मौन’ उभी राहिली. तिने भाषण केले नाही, पण दीपिकाचे मौन हा संस्कार व शिक्षणाचा प्रभाव होता, पण त्यानंतर दीपिकावर झालेले असभ्य हल्ले, तिच्या चित्रपटांवरील बहिष्कार हे अज्ञान, अंधकारात देश चाचपडत असल्याचे लक्षण होते.

आता देशाच्या शहाणपणावर प्रश्न निर्माण केल्याने अभिनेत्री काजोलही असभ्य, अज्ञानी लोकांच्या निशाण्यावर आली. या देशात सध्या शिक्षणावर बोलण्याची सोय राहिलेली नाही. धर्माचा गांजा ओढून शिक्षितही अंधभक्त बनले आहेत. त्यावर उपाय काय? काजोलने अंधभक्तांच्या डोळय़ांत ज्ञानाचे काजळ घातले खरे, पण तरीही भक्त आंधळेच राहिले!