पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक का केलं? संजय राऊतांनी सामनातून अर्थ सांगितला…

| Updated on: Dec 13, 2022 | 8:11 AM

सामनातून शिंदे सरकारवर टीकास्त्र...

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक का केलं? संजय राऊतांनी सामनातून अर्थ सांगितला...
Follow us on

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलंय. “कर्नाटकचे मुख्यमंत्री रोजच महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत. त्या अपमानावर केंद्राकडे आवाज उठविण्याची हिंमत न दाखवल्यामुळेच पंतप्रधानांनी (Narendra Modi) नागपूरच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारलेली दिसते”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

“शाब्बास, शाब्बास, मुख्यमंत्री शाब्बास! मुंबईतील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून त्यांच्या ‘निर्भया’ योजनेतील पोलीस वाहने खोकेबाज बेइमान आमदारांच्या सुरक्षेसाठी लावल्याबद्दल तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना जवळ खेचून शाब्बासकी दिली नसेल ना? महिलांना सुरक्षा नाही व गद्दार आमदारांच्या मागे-पुढे पोलिसी लवाजमा. यालाच म्हणतात- ”आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या!” आपल्या देशाची अर्थव्यवस्था याच पायावर उभी आहे”, असंही सामनात म्हणण्यात आलंय.

शाबासकीचा अर्थ काय?

मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली म्हणजे जी काही शाब्बासकी दिली ती कशासाठी? तर ”शाब्बास! जे काम औरंगजेब, अफझल खानास जमले नाही, ते शिवसेना फोडण्याचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केलेत. शाब्बास रे माझ्या गब्रू!” शाब्बासकी असेल ती यासाठीच, असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानानांनी मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या कौतुकावर भाष्य करण्यात आलं आहे.

“पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी नागपूर-शिर्डी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. सोहळा उत्तमच झाला. पंतप्रधान मोदी यांनी देशाची लूट करणाऱ्यांवर व भ्रष्ट मार्गाने राज्य करणाऱ्यांवर एका तळमळीने आसूड ओढले, पण हे शब्दांचे आसूड ओढताना त्यांनी आपल्या डाव्या-उजव्या बाजूला कटाक्ष फेकला असता तर देशाची लूट करणारे, भ्रष्ट मार्गाने राज्य करणारे कोण हे लक्षात आले असते. पंतप्रधानांच्या व्यासपीठावरच एक घटनाबाह्य सरकार बसले होते व ‘खोके’ सरकार म्हणून ते बदनाम आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कितीही तळमळीने भावना व्यक्त केल्या तरी ते एकटे कोठे पुरे पडणार?”, असं म्हणत शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे.