भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र लथपथ झाली, तरी चिंतेची शिंक काढायची नाही, ‘सामना’तून हल्लाबोल

भगवा-भगवा आणि रक्ता-रक्तात फरक करणारे मानवी मन गमतीचे आहे, हे म्हणूनच आम्ही म्हणतो, असा तिरकस वारही अग्रलेखातून करण्यात आला आहे. (Saamana on Uttar Pradesh Bulandshahar Murder)

भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र लथपथ झाली, तरी चिंतेची शिंक काढायची नाही, सामनातून हल्लाबोल
| Updated on: Apr 30, 2020 | 2:18 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. “महाराष्ट्रात घडलं की चिंतेचा माहौल करतात, भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र लथपथ झाली, तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही” अशा शब्दात योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. (Saamana on Uttar Pradesh Bulandshahar Murder)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक साधू आहेत. त्यांच्या साधुत्वाचा आम्ही नेहमीच आदर केला. महाराष्ट्रात मध्यंतरी दोन साधूंची हत्या जमावाने केली, ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी बाब आहे. ज्या गावात हत्या झाली, ते संपूर्ण गाव भाजपच्या राजकीय अधिपत्याखाली बऱ्याच वर्षांपासून आहे, पण अशा प्रसंगात राजकारण नको असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आणि 72 तासात शंभरावर आरोपीना बेड्या ठोकल्या, याकडे ‘सामना’च्या अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.

या प्रसंगावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करुन चिंता व्यक्त केली होती. भगव्या वस्त्रातील साधूंची हत्या होणे ठीक नाही, ही त्यांची चिंता समजण्यासारखी आहे. साधूंचे मन साधूच जाणतो. पण पुढच्या दहा दिवसात योगी महाराजांच्या राज्यातच बुलंदशहरमधील देवळात दोन साधू महाराजांची हत्या झाली. महाराष्ट्रातील साधूंचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला, तर योगींच्या राज्यात साधूंना गळे चिरुन मारले. या हत्येवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी फोन करुन चिंता व्यक्त केली. हा प्रसंग राजकारण करण्याचा नसून गुन्हेगारांना एकत्रित येऊन धडा शिकवण्याचा आहे, असं ठाकरे म्हणाले. मात्र यात काही लोकांना राजकारणाचा वास येत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा : पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : दलवाई

तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधानं योगींच्या कार्यालयातून केल्याचं स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की चिंतेचा माहौल निर्माण केला जातो, किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली, तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगवा-भगवा आणि रक्ता-रक्तात फरक करणारे मानवी मन गमतीचे आहे, हे म्हणूनच आम्ही म्हणतो, असा तिरकस वारही अग्रलेखातून करण्यात आला आहे.