“कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी..”; कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर राऊतांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 07, 2024 | 11:10 AM

चंदीगड विमानतळावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतला एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कानाखाली मारली. या घटनेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आईबद्दल कोणी चुकीचं म्हटल्यास राग येणारच, असं ते म्हणाले.

कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी..; कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut and Kangana Ranaut
Image Credit source: Instagram
Follow us on

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका महिला कॉन्स्टेबलने गुरुवारी चंदीगड विमानतळावर मंडीच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला थप्पड मारली. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं असून तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने सांगितलं की कंगना विमानामध्ये चढण्यापूर्वी विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान सीआयएसएफ कॉन्स्टेबलने अभिनेत्रीला कथितपणे थप्पड मारली. त्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करून घडलेल्या घडनेविषयी सांगितलं. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा घेतला. मात्र एका खासदारावर अशा पद्धतीने हाच उचलणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

“जर त्या कॉन्स्टेबलने असं सांगितलं असेल की तिची आई तिथे बसली होती, तर ते खरं आहे. तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली असेल आणि आईबद्दल कोणी चुकीचं बोलत असेल तर नक्कीच लोकांच्या मनात चीड येते, संताप येतो, क्रोध येतो. जर मोदीजी म्हणतात की कायद्याचं राज्य आहे तर कायदा हातात नाही घेतला पाहिजे. कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला. भारत मातासुद्धा त्यांची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनाला बसले होते, ते भारतमातेचे पुत्र होते, कन्या होत्या. जर कोणी भारतमातेचा अपमान केला असेल आणि कोणाला राग आला असेल तर मला असं वाटतं की त्याविषयी विचार केला पाहिजे,” असं राऊत म्हणाले.

कंगनाविषयी सहानुभूती व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “मला कंगनाविषयी सहानुभूती आहे. त्यासुद्धा खासदार आहेत आणि खासदारावर अशा पद्धतीने हात उचललं नाही पाहिजे. मात्र या देशात शेतकऱ्यांचा आदर झालाच पाहिजे, मग ते शेतकऱ्यांचे पुत्र असोत किंवा कन्या असोत.
लोकांच्या मनात अजूनही किती राग आहे, हे समजून घेतलं पाहिजे. कंगनाने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं, तेव्हासुद्धा लोकांचा राग अनावर झाला होता. राग येण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच नाही तर आम्हालासुद्धा आहे. पण खासदारावर अशा पद्धतीने हात उचलणं ठीक नाही.”

हे सुद्धा वाचा

कंगना काय म्हणाली?

विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत तिने सांगितलं, “दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने मला थप्पड मारली आणि शिवीगाळ केली. जेव्हा मी तिला असं का केलं विचारलं असता, तिने मला ती शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचं सांगितलं.” कंगनाने ‘पंजाबमधील दहशतवाद आणि हिंसाचारात धक्कादायक वाढ’ असं लिहित हा व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये तिने सांगितलं की, ती सुरक्षित आणि ठीक आहे. पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे ती चिंतेत आहे.