विरोधी आमदारांमध्येही शिंदे-फडणवीसांबद्दल आपुलकी का?; शहाजी बापूंनी सांगितली फडणवीस-शिंदेंची दिलदारी
एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या सर्व आमदारांना आसाममधील गोवाहाटीमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांचा देखील समावेश आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी आपल्याला शिवसेनेतील जवळपास 55 पैकी 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांना काही अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेल्या सर्व आमदारांना आसाममधील गोवाहाटीमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा देखील समावेश आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या फोनमध्ये शहाजी बापू पाटील यांनी नेमकं काय काय घडलं, आपण इथे कसे आलो? इथे आपली व्यव्यस्था कशी ठेवण्यात आली आहे याबाबत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला सविस्तर माहिती दिली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. शिंदे आणि फडणवीस हे दिलदार नेते असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले आहे.
काय म्हटलं शिंदे फडणवीसांबाबत?
शाहाजी बापू पाटील या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना म्हणतात की, मला काही दिलं नाही तरी फरक पडत नाही. फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणजेच आपणच उपमुख्यमंत्री असल्यासारखे आहे. फडणवीस साहेब आणि माझं नातं तुम्हाला तर माहितच आहे, त्यांच्यासोबत माझे नाते भावासारखे आहे. शिंदे साहेब मला मुलासारखं वागवतात. मुलाच्या नजरेनं बंघतात. लय प्रेमळ नजर त्या माणसाची माझ्यावर हाय हो. एकनाथ शिंदे यांचा संयमीपणा, राजकीय बुद्धिमता हे दोन गुण मला भावले. दिल्लीचे बजेट कसे असते?, राज्याचे बजेट कसे असावे, राज्याचा कसा विकास व्हावा याचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर चौथं नेतृत्व मला एकनाथ शिंदे यांचंच वाटतं.



उद्धव ठाकरेंना आमदार का सोडून जात आहेत?
दरम्यान उद्धव ठाकरे यांना आमदार का सोडून जात आहेत, याबद्दल देखील शहाजी बापू पाटील यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये सांगीतले आहे. आमदारांना ठाकरे साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. मात्र पुढच्या निवडणुकीत जर युती झाली तर राष्ट्रवादी आपल्या सगळ्या जागा बळकवतील, त्यामुळे आपल्याला तिकीट मिळेल की नाही अशी शंका या आमदारांच्या मनात असल्याचे शाहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच अशी आमदारांची भावना असल्याचे शहाजी बापू पाटील सांगतात.