शिंदे- फडणवीस नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील हे स्वप्न पाहू नका; अजित पवार यांचा कुणाला टोला
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले. त्यानंतर शिंदेनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. न्यायालयाच्या या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा मिळत आहे. मात्र नैतिकेच्या आधारे शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे.
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस हे काही राजीनामा देणार नाही. प्रत्यक्षात तर नाहीच पण स्वप्नातही कोणी असा विचार करू नये असा टोला अजित पवार यांनी लागवला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे विधान केले आहे.
आधीच्या काळातील राजकारण्यांची बात काही और होती. अटल बिहारी वाजपेयी आणि आताच्या काळातील नेते यांच्यात जमीन -अस्मानाचा फरक आहे, असे सांगत आता नैतिकतेच्या आधारावर कोणीही पायउतार होणार नाही , असे पवार म्हणाले. शिंदे फडणवीस राजीानामा देतील असा विचारही करू नका, असेही त्यांनी नमूद केले.
ती आमची मोठी चूक ठरली
नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले नाही. तो राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षांबाबत लगेच निर्णय घ्यायला हवा होता. पण तो विषय तातडीने निकालात निघाला नाही. ते पद रिक्त ठेवणे ही आमची चूक झाली असे अजित पवार यांनी कबूल केले.
अनेक काळ विधानसभेचे उपाध्यक्ष कामका पाहत होते. सत्तांतरानंतर भाजपा-शिवसेनेने तत्काळ बहुमताने विधानसभा अध्यक्षपद भरले. त्या वेळी जर आमचा अध्यक्ष असता तर ही वेळच आली नसती, ते 16 आमदार त्याचवेळी अपात्र ठरले असते. असे सांगत अजित पवार यांनी ती महाविकास आघाडीची मोठी चूक झाल्याचे नमूद केले.
पक्षांतर बंदी कायद्याला अर्थ उरला आहे का ?
या निकालाने पक्षांतरबंदी कायद्याला काही अर्थ उरणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही अजित पवार म्हणाले.