PM Modi in NDA Meeting : NDA च्या बैठकीतील मोठी बातमी, पंतप्रधान मोदी काय बोलले?

| Updated on: Jul 02, 2024 | 11:21 AM

PM Modi in NDA Meeting : संसदेच अधिवेशन सुरु आहे. नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने अधिवेशानाला सुरुवात झाली. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी 3.0 सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याला आज पीएम मोदी उत्तर देणार आहेत.

PM Modi in NDA Meeting : NDA च्या बैठकीतील मोठी बातमी, पंतप्रधान मोदी काय बोलले?
PM Modi in NDA Meeting
Follow us on

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज संसदेत बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केलं. “तीन वेळा आपला विजय झाल्यामुळे काहीजण बेचैन झाले आहेत. पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. नवीन संसद आणि त्याची प्रक्रिया समजून घ्या” असं पीएम मोदी म्हणाले. “एनडीएच्या सगळ्या खासदारांच्या बोलण्यामध्ये एकवाक्यता हवी, एनडीएचा एक प्रवक्ताही असावा” असं पंतप्रधान मोदींनी मत व्यक्त केलं. “नेहरूंच्या समोर कुठल्याही अडचणी नसताना ते जिंकले होते. पण आपल्यासमोर अनेक आव्हान आणि अडचणी असतानाही आपण जिंकलो” असं पीएम मोदी म्हणाले.

“माध्यमांना प्रतिक्रिया देताना सावधपणे द्या. काही घराण्यातील अनेक जण पंतप्रधान झाले. पण एक चहावाला पंतप्रधान झाल्यामुळे ही गोष्ट त्यांना पचत नाही” अशा शब्दात पीएम मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘संसदेच्या अधिवेशनात जास्तीत जास्त सहभाग नोंदवा’ असा मोदींनी खासदारांना मंत्र दिला.

मोदी काय म्हणाले?

NDA संसदीय पक्षाची बैठक झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू मीडियाशी बोलले. “आज पंतप्रधान मोदींनी आम्हाला मंत्र दिला, जो खूप महत्त्वाचा आहे. देशसेवेसाठी सर्व खासदार सभागृहात निवडून आले आहेत. खासदार कुठल्याही पक्षाचे असोत, देशसेवा पहिली जबाबदारी आहे. NDA च्या प्रत्येक खासदाराने देश हिताला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे असं मोदी म्हणाले” किरेन रिजीजू यांनी ही माहिती दिली.


NDA खासदारांना मोदींची काय विनंती?

“खासदारांच्या वर्तनाबद्दलही पंतप्रधान मोदींनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. नियमानुसार, प्रत्येक खासदाराने सभागृहात त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडले पाहिजेत. पाणी, पर्यावरण या विषयात जास्तीत जास्त ज्ञान कमावण्याचा सल्ला त्यांनी दिला. एनडीए खासदारांना त्यांनी संसदीय लोकशाहीचे नियम पाळण्याची विनंती केली” असं किरेन रिजीजू म्हणाले.