…ही तर राजकीय आत्महत्या, वाईट वाटण्याचं कारण काय? राणे यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आता वाईट वाटून काहीच फायदा नाही. आत्महत्या करणाऱ्या माणसाला त्याचं काय वाईट वाटणार?, कारण तो स्वत:च आत्महत्या करत असतो. तशीच उद्धव ठाकरे यांनी स्वत:च आपली राजकीय आत्महत्या केल्याची टीका नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने आमदारांशी वागले, पदाधिकाऱ्यांशी वागले त्यामुळे एक-एक जण त्यांच्या डोळ्यादेखत पक्षातून बाहेर पडला. 40 आमदार बाहेर पडले, मात्र एकालाही अडवण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत झाली नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलं?
नायारण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला आत्महत्या केल्याचं काय वाईट वाटणार. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च त्यांची राजकीय आत्महत्या केली. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागले, त्यामुळे 40 आमदारांनी उठाव केला, मात्र त्यातील एकालाही आडवण्याची उद्धव ठाकरे यांची हिंमत झाली नाही. आता वाईट वाटून काय फायदा? हा नियतीचा खेळ असतो, कधीकधी काही गोष्टी वाटल्या तरी सांगायच्या नसतात असा सल्लाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुंबईची जबाबदारी राणे यांच्याकडे
येत्या काळात मुंबईत महापालिका निवडणुकांसह इतरही काही निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना रोखण्याची जबाबदारी भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या संघटनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही काही दिवसांपूर्वी मुंबईत करण्यात आलं होतं.