“…तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच”, रामदास आठवले असं का म्हणाले?
जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असतं, तर ते कदाचित बाहेर पडले नसते", असे रामदास आठवलेंनी म्हटले.
Ramdas Athawale on Maharashtra Chief Minister : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, महायुती आणि महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा असणार या चर्चा रंगल्या आहेत. आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्रिपदावरुन एक मोठं वक्तव्य केले आहे. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे माझी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. आता यावर रामदास आठवले यांनी भाष्य केले. “राजकारणामध्ये दोघेही राहतील. कारण एक व्यक्ती असेल तर राजकारण होत नसतं”, असे रामदास आठवले म्हणाले.
“…तर ते बाहेर पडले नसते”
“उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. पण माझी दोघांनाही विनंती आहे की राजकारणामध्ये दोघांनीही राहायला हवं. ते दोघेही माझे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही. एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं. जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असतं, तर ते कदाचित बाहेर पडले नसते”, असे रामदास आठवलेंनी म्हटले.
“उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची पुन्हा मैत्री व्हावी”
“एकनाथ शिंदे हे स्वतः आमच्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं हा गैरसमज दूर करायला हवा. उद्धव ठाकरे यांच्या मनात फडणवीसांबद्दल राग आहे, तोही त्यांनी काढून टाकायला हवा. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची चांगली मैत्री होती. ती पुन्हा एकदा व्हावी, अशी आमची इच्छा आहे”, असेही रामदास आठवले म्हणाले.
पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
यानंतर रामदास आठवले यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केले. “जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा वाद मिटला नाही, तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच आहे”, असे रामदास आठवले यांनी म्हटले. यामुळे आता राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.