लग्न कधी होणार? कंगना राणौतचे नाव घेताच केंद्रीय मंत्री चक्क लाजले…
केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे राजकारणात येण्यापूर्वी यांनी चित्रपट सृष्टीत काम केले होते. त्यांची मुख्य भूमिका असलेला 'मिले ना मिले हम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चिराग पासवान यांना लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते चक्क लाजले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशाचे सर्वात तरुण केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी समाधान व्यक्त केले. देशात अनेक तरुण आहेत जे बॅचलर आहेत. त्यांच्या भविष्याची सरकारला काळजी आहे. सरकारने आपल्या तरुणांच्या रोजगारासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार देण्याचा विचार सरकार करत आहे याचा मला आनंद आहे असे ते म्हणाले. याचवेळी चिराग पासवान यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले त्यावेळी ते लाजून हसले.
चिराग पासवान यांना विचारण्यात आले की, तुमचा एक चित्रपट ‘मिले ना मिले हम’ रिलीज झाला होता. त्याचवेळी तुम्ही संसदेत आलात. चित्रपटामधील तुमची नायिका यादेखील आता मंडीच्या खासदार आहेत. संसदेत येताना तुमच्या आणि मंडीच्या खासदार कंगना राणौत यांची भेट झाली. त्या फोटोंची बरीच चर्चा आहे. तुमची भावना त्यावेळी काय होती? चिराग पासवान लग्न कधी करणार? असे प्रश्न विचारण्यात आले. हा प्रश्न ऐकून चिराग पासवान लाजले.
चिराग पासवान यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले, ते म्हणाले, ‘या सर्व प्रश्नांची उत्तरे यावेळी कोणी देऊ शकेल का? आता माझ्या मनात फक्त राजकारण चालते बाकी काही येत नाही. हो त्यावेळी मी त्यांना भेटलो. निवडणूक प्रचारादरम्यानही त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक होतो. चित्रपटानंतर आमची फारशी भेट झाली नाही. गेली तीन वर्षे इतक्या चढउतारांनी भरलेली होती की या काळात आमच्यात बोलणेही झाले नाही. खूप दिवसांनी त्यांची भेट झाली आणि खूप छान वाटले असे त्यांनी सांगितले.
कंगना रनौत आणि चिराग पासवान यांनी मिले ना मिले हम या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. चिरागचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. याची आठवण करून देत ते म्हणाले, मी फक्त नेता होऊ शकलो मात्र अभिनेता कधीच होऊ शकत नाही.