Chanakya Niti : पुरुष आणि स्त्रियांनी कोणत्या गोष्टी सिक्रेट ठेवाव्यात; चाणक्यांनी जे सांगितलं ते ऐकून…
आयुष्यात अनेक उतार चढाव येत असतात. अनेक संकटं येत असतात. अनेक प्रश्न असतात. अनेक तणाव असतात. अशा संकटाच्यावेळी माणूस हतबल होतो. पण एखाद्याला वाचनाची किंवा ऐकण्याची सवय असेल तर तो या तणावातून बाहेर येऊ शकतो. आर्य चाणक्यांनी काही नैतिक शिकवणी दिल्या आहेत. नीतीमूल्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जीवनभाष्येही केली आहेत. त्या अशा प्रसंगात नेहमी कामाला येऊ शकतात.
आचार्य चाणक्यांनी जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे. नीतीमूल्यांपासून धर्मकारणापर्यंत आणि संसारीक गोष्टींपासून ते राजकीय आणि सामाजिक व्यवहारांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. जर एखाद्याने आयुष्यात नैतिकतेचं पालन केल्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे अनेकजण नैतिकतेने वागतात. चाणक्य यांनी पुरुष आणि स्त्रीयांबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहे. पुरुष आणि स्त्रीयांनी आपली रहस्य कधीच कुणाला सांगू नयेत, नाहीतर भविष्यात हानी होऊ शकते, असं चाणक्य म्हणतात. चाणक्य यांचा हा सल्ला नेमका काय आहे, त्यावर टाकलेला हा प्रकाश.
चरित्र
आर्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. एक दुसऱ्यांच्या उणींवावर पडदा टाकला पाहिजे. घरात वाद झाले तर ते घरातच मिटवले पाहिजे. जर पुरुष किंवा स्त्रीने घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगितल्या किंवा जोडीदाराच्या चारित्र्याबाबत सांगितलं तर अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता अधिक असते. कारण ती व्यक्ती या गुपिताचा गैरफायदा घेईल आणि वेळ आल्यावर त्यावरून थट्टाही करू शकतो.
आर्थिक नुकसान
आर्य चाणक्यानुसार, जर तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर ते कधीच जाहीर करू नका. कारण तुम्हाला आर्थिक नुकसान झाल्यावर काही लोक तुमच्यासमोर दु:ख व्यक्त करतील, पण वास्तवात त्यांना पराकोटीचा आनंद झालेला असेल. तुमच्या पाठमागे ते तुमच्यावर तोंडसुख घेतील. समाजात सन्मान कायम राहू द्यायचा असेल तर आर्थिक नुकसानीची चर्चा करू नका. नाही तर लोक तुमच्यापासून दुरावतील.
अपमान
आर्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा तुमच्या काळजाला ठेच पोहोचवली असेल तर कुणालाही सांगू नका. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगाल, ती व्यक्ती तुमच्याबाबत चुकीचा विचार करू शकते. त्यामुळेच अपमानाच्या बाबत कुणालाही सांगू नका. मग ती पत्नी का असेना किंवा पती का असेना.
आजार
आर्य चाणक्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे, महिलांना नेहमी आपले आजार लपवण्याची सवय असते. अस्वस्थ वाटू लागल्यावरही त्या नवरा किंवा कुटुंबीयांसमोर आजाराची माहिती देत नाही. स्वत: तणावात राहतात. त्यामुळे आरोग्यावर अधिकच परिणाम होतो. आजार लपवून ठेवल्याने, दीर्घकाळ उपचार न झाल्याने आजार अधिकच बळावतो. त्यामुळे केवळ तुम्हालाच त्रास होत नाही, तर अख्खं घर वेठीला येतं. त्यामुळे स्त्री असो की पुरुष कुणीही आपला आजार कधीच लपवू नये. वेळीच वैद्यांकडे गेल्यास आजार बरा होतो, असं चाणक्य म्हणतात.