रोहित शर्माच्या टीमला 125 कोटी मिळताच 1983 वर्ल्डकप चॅम्पियन्सने बीसीसीआयकडे केली अशी मागणी
टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियावर बक्षिसाचा वर्षाव झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षीस दिलं. इतकं मोठं बक्षीस मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आयसीसीच्या बक्षीसी रकमेपेक्षा ही रक्कम कितीतरी पटीने अधिक आहे. यानंतर आता 1983 वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने बीसीसीआयकडे एक गाऱ्हाणं घातलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जिंकलाय 11 वर्षानंतर टीम इंडियाने आयसीसी चषकावर नाव कोरलं. या विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं. तसेच टीम इंडियावर सर्वच स्तरातून बक्षीसाचा वर्षाव झाला. बीसीसीआयने बक्षिसाच्या रुपाने 125 कोटींचं बक्षीस टीम इंडियाला दिलं. आतात 1983 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूने बीसीसीआयकडे थेट बक्षिसाची मागणी केली आहे. नाव न लिहिण्याच्या अटीवर 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाच्या खेळाडूने सांगितलं की, कपिल देवच्या संघाने देशाचं नाव उज्ज्वल केलं होतं. यासाठी बीसीसीआयने त्याच्या मेहनतीची दखल घ्यायला हवी. रोहित शर्माप्रमाणे या संघालाही बक्षीस जाहीर करावं. रोहित शर्मा आणि कपिल देव यांच्या संघात बीसीसीआयने दुटप्पी भूमिका घेतली आहे. एकीकडे 125 कोटींची रक्कम दिली जात आहे. तर 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाला बोर्डाने सांगितलं होतं की, त्यांच्याकडे पैसे नाहीत. 125 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे आणि रोहित शर्माच्या टीमसाठी खूश आहे. पण कपिल देवच्या टीमला काहीच मिळालं नव्हतं.
“कपिल देवच्या संघातील काही खेळाडूंना काम मिळतंय. पण बाकी खेळाडूंकडे ना पैसा आहे ना काम..आता बीसीसीआयकडे पैसा आहे, तर बोर्डाने 1983 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंचा विचार करावा. या खेळाडूंना बक्षिसाच्या रुपात रक्कम द्यावी. त्यांना असं करण्यापासून कोण थांबवत आहे “, असंही 1983 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूने सांगितलं. 1983 साली भारतीय क्रिकेट बोर्ड आता इतकं श्रीमंत नव्हतं. टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितलं होतं की, त्यावेळेस बीसीसीआयने वर्ल्ड चॅम्पियन संघाला फक्त 25 हजार रुपये दिले होते. तेव्हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना याबाबत कळताच त्यांनी यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि पैसे जमवले. त्या कार्यक्रमातून 20 लाख रुपये मिळाले आणि प्रत्येक खेळाडूला 1-1 लाख रुपये दिले गेले.
1983 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये वेस्ट इंडिज संघाचा पराभव करणाऱ्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये – सुनील गावस्कर, ख्रिस श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील, कपिल देव (कर्णधार), बलविंदर संधू (विकेटकीपर), कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, मदन लाल, सय्यद किरमाणी यांचा समावेश होता.