Asia Cup 2024 : भारताने युएईला 7 विकेट राखून केलं पराभूत, उपांत्य फेरीत स्थान जवळपास पक्कं

| Updated on: Oct 21, 2024 | 9:30 PM

आशिया कप 2024 स्पर्धतील साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने युएईला पराभूत केलं. यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा शेवटचा सामना ओमानसोबत आहे. पण तीन पैकी दोन सामने जिंकल्याने आता उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्कं झालं आहे.

Asia Cup 2024 : भारताने युएईला 7 विकेट राखून केलं पराभूत, उपांत्य फेरीत स्थान जवळपास पक्कं
Follow us on

एसीसी इमर्जिंग टीम आशिया कप 2024 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल युएईच्या बाजूने लागला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय युएईच्या अंगलट आला असंच म्हणावं लागेल. कारण त्यांना प्रथम फलंदाजी करूनही 20 षटकं पूर्ण खेळता आली नाही. युएईच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकली असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. युएईकडून राहुल चोप्रा वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने 50 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर युएईचा संघ कसाबसा 100 धावांच्या पार गेला. युएईने 16.5 षटकात सर्व गडी गमवून 107 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 108 धावांचं आव्हान ठेवलं. भारताने हे आव्हान 3 विकेट गमवून पूर्ण केलं. भारताने युएईविरुद्ध एकूण 8 गोलंदाज वापरले हे विशेष ठरलं. फक्त राहुल चाहरने त्याची 4 षटकं पूर्ण केली पण एकही विकेट घेता आली नाही.

भारताकडून रसिख सलाम हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 षटकं टाकत 15 धावा देत 3 गडी बाद केले. त्यानंतर रमनदीप सिंगने 2 षटकात 7 धावा देत 2 गडी बाद केले. अंशुल कंबोजने 2 षटकात 17 धावा देत 1 गडी बाद केला. वैभव अरोराने 2 षटकात 8 धावा देत 1 विकेट मिळवली. अभिषेक शर्माने 1 षटक टाकलं आणि 1 गडी बाद करण्यात यश आलं. तर नेहल वढेराने संघाचं 17 वं षटक टाकताना फक्त 5 चेंडू टाकले आणि एकही धाव न देता शेवटची विकेट घेतली.

युएईने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ उतरला. पण पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंगच्या रुपाने धक्का बसला. त्याने एक षटकार मारून आक्रमक पवित्रा दाखवून दिला. ओमिद रहमानचा चेंडूवर फटका मारताना चुकला आणि विकेट देऊन बसला. त्यानंतर अभिषेक शर्माने आपली तडाकेबंद फलंदाजी दाखवली. अभिषेक युएई संघावर तुटून पडला होता. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 50 धावा ठोकल्या. तसेच 24 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट 241.67 इतका होता.