रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेचा संयम सुटला, श्रेयस अय्यरबाबत स्पष्टच सांगितलं की…
बीसीसीआयने कठोर पावलं उचलल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व वाढलं आहे. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्या खेळाडूंना इंगा दाखवला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर काढलं आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळणार असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना चांगलाच इंगा दाखवला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना दुय्यम स्थान देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळलं आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्त ताकीद दिली आहे. बीसीसीआयचं असं असताना क्रिकेटपटूंचे धाबे दणाणले आहेत. श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उपांत्य फेरीत मुंबईचा सामना तामिळनाडूशी होणार आहे. दरम्यान, पाठदुखीच्या कारण सांगत श्रेयस उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला नव्हता. त्यानंतर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलताच सुतासारखा सरळ झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता त्याने उपांत्य फेरीत खेळण्यासाठी तयार आहे. मुंबईची कर्णधार अजिंक्य रहाणेनेही त्याचं समर्थन केलं आहे. श्रेयस अय्यर जेव्हा मुंबईसाठी खेळला तेव्हा आपलं योगदान दिलं आहे, तसेच अनुभवी खेळाडू आहे. तसेच त्याला सल्ला देण्याची गरज नाही, असंही स्पष्ट केलं.
“तो एक अनुभवी खेळाडू आहे. जेव्हा कधी मुंबईसाठी खेळला तेव्हा त्याचं योगदान राहिलं आहे. आता उपांत्य फेरीत खेळणार असल्याने आम्ही आनंदीत आहोत. मला वाटत नाही त्याला प्रोत्साहान किंवा सल्लाची गरज आहे. त्याचं मुंबईसाठी फलंदाजीने योगदान दिलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये इतर खेळाडूंना त्याची नक्कीच मदत होईल.”, असं मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सांगितलं.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत 384 धावा केल्या. प्रत्युत्तरात बरोडा संघ पहिल्या डावात केवळ 348 धावाच करू शकला.मुंबईला पहिल्या डावाच्या आधारे 36 धावांची आघाडी मिळाली. मुंबईने दुसऱ्या डावात 569 धावा केल्या. बरोड्याला विजयासाठी 606 धावांचे लक्ष्य मिळाले. पण बरोडा संघ 3 गडी गमावून केवळ 121 धावा करू शकला आणि सामना अनिर्णित राहिला.
रणजी ट्रॉफी 2024 मधील उपांत्य फेरीचे वेळापत्रक
- पहिला उपांत्य सामना – विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश, 2 मार्च ते 6 मार्च; नागपूर
- दुसरा उपांत्य सामना – मुंबई विरुद्ध तामिळनाडू, 2 मार्च ते 6 मार्च; मुंबई
- अंतिम सामना- 10 मार्च ते 14 मार्च