विराट-रोहित नाही तर या खेळाडूचं ऑस्ट्रेलियाला टेन्शन, कर्णधार पॅट कमिन्सने केला खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. क्रीडारसिकांचं या मालिकेवर लक्ष लागून आहे. कारण मागच्या दोन मालिकांमध्ये भारतीय संघ वरचढ ठरला आहे. आता ऑस्ट्रेलियन संघ वचपा काढण्यासाठी सज्ज आहे. असं असताना ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने धक्कादायक खुलासा केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. पण या मालिकेपू्र्वी शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियन संघ यासाठीच ओळखला जातो. डिवचून एखाद्या संघाचं खच्चीकरण करायचं आणि सामन्यात त्याचा प्रभाव पाडायचा. पण मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाचा हा डाव सर्व संघांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे त्याला तोडीस तोड उत्तर दिलं जातं. भारताने मागच्या दोन बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ बिथरलेला दिसत आहे. असं असताना आता ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने एक खुलासा केला आहे. भारताच्या एका खेळाडूची जबरदस्त दहशत असल्याचं मान्य केलं आहे. हा खेळाडू विराट-रोहित यांच्यापैकी नसून भारतीय गोलंदाजी भात्यातील प्रमुख अस्त्र आहे. ऑस्ट्रेलियन संघाला जसप्रीत बुमराहची भीती सतावत आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत विजय मिळवायचा असल्यास जसप्रीत बुमराहला रोखणं महत्त्वाचं असल्याचं पॅट कमिन्सने कबुल केलं. पॅट कमिन्सने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, ‘मी बुमराहचा खूप मोठा फॅन आहे. तो एक जबरदस्त गोलंदाज आहे. जर बुमराहवर लगाम लावण्यास यशस्वी ठरलो तर मालिका आरामात खिशात घालू.’ इतकं सांगितल्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे भारताला डिवचण्याची संधी काय सोडली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये हरवलं त्यातून प्रेरणा घेऊ, असं सांगत जखमेवर मीठ चोळलं.
पॅट कमिन्सने सांगितलं की, ‘भारताविरुद्ध मागच्या मालिका खेळून खूप वेळ झाला आहे. आता आम्ही त्यातून सावरलो आहे.’ दुसरीकडे, रोहित शर्माबाबत फार काही माहिती नसल्याचं त्याने सांगितलं. कधी एका संघात खेळलो नसल्याने फार काही माहिती नाही. पण रोहित शर्माला एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. इतकंच काय तर चेतेश्वर पुजारा संघात नसल्याने वेगळा अनुभव येणार आहे. त्याने 2018-19 आमि 2020-21 मध्ये भारताला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.