चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तान सामना ‘या’ तारखेला होणार
टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर भारताचं पुढचं लक्ष्य आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात होणार असून यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्याची तारीख पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निश्चित केली आहे.
![चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तान सामना 'या' तारखेला होणार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तान सामना 'या' तारखेला होणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/IND_vs_PAK-11.jpg?w=1280)
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला आणखी एक आयसीसी स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. सात महिन्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. पण पाकिस्तानने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार हे निश्चित झालं आहे. हा सामना कुठे आणि कधी खेळणार याबाबतही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठरवलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सठी 1 मार्च ही निश्चित केली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ सदस्याने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. पण बीसीसीआयकडून अजूनही या स्पर्धेबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही. कदाचित आशिया कपप्रमाणे हायब्रिड मॉडेलवर ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. भारताचे सामने पाकिस्तान बाहेर होण्याची शक्यता आहे. पण यावर आता कसा तोडगा निघतो आणि भारतीय संघ जातो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. 10 मार्च हा अंतिम फेरीसाठी राखीव दिवस असेल. रिपोर्टनुसार, भारतीय संघ ए ग्रुपमध्ये असून यात पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत. आयसीसी बोर्डाच्या सदस्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 15 सामन्यांचा ड्राफ्ट जमा केला आहे. लाहोरमध्ये सात, कराचीत तीन आणि रावलपिंडीत पाच सामने होतील असं सांगण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये असतील. तर ओपनिंग मॅच कराचीत होईल. तर सेमीफायनल कराची आणि रावलपिंडीत होईल. तर अंतिम फेरीचा सामना लाहोरमध्ये होईल.
Champions Trophy Groups (PTI):
Group A: India. Pakistan. Bangladesh. New Zealand.
Group B: Australia. South Africa. England. Afghanistan.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 3, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाला पाकिस्तानचा वचपा काढण्याची संधी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटची 2017 मध्ये खेळवली गेली होती. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. पाकिस्तानने 50 षटकात 4 गडी 338 धावा केल्या आणि विजयासाठी 339 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघ फक्त 158 धावा करू शकला. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी धुव्वा उडवला होता. या स्पर्धेतही भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. तर बाबर आझमकडे पाकिस्तानचं नेतृत्व असण्याची शक्यता आहे.