रिंकु सिंहबाबत माजी बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी उघड केली अशी बाब, ‘नेटमध्ये फलंदाजी करताना पाहतो तेव्हा…’
रिंकु सिंह हे सध्या भारतीय क्रिकेटमधलं चर्चेत असलेलं नाव आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत पाच षटकार मारत सामना फिरवल्यानंतर एकदमच प्रकाशझोतात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याने आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतलं आहे. असं असताना माजी बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी त्याच्याबाबतची एक गोष्ट अधोरेखित केली आहे.
रिंकु सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पाच ते सहा मालिका खेळला आहे. यात त्याने डेथ ओव्हरमध्ये केलेली फटकेबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. 300 च्या स्ट्राईक रेटने त्याने 20व्या षटकात धावा केल्या आहेत. त्यामुळे रिंकु सिंहकडे टी20 क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळेच राखीव का होईना टी20 वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये त्याची निवड केली होती. झिम्बाब्वे दौऱ्यातही रिंकु सिंहने चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात खातंही खोलता आलं नव्हतं. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने जोरदार कमबॅक केलं. तसेच फिल्डिंगमध्येही त्याने केलेली कामगिरी पाहता त्याला मेडल दिलं गेलं. पण माजी बॅटिंग कोच विक्रम राठोड रिंकु सिंहकडे वेगळ्याच दृष्टीने पाहात आहेत. रिंकु सिंहची निवड फक्त टी20 क्रिकेटपुरता मर्यादित न ठेवता त्याचा विचार टेस्टसाठी व्हावी असा सल्ला राठोर यांनी दिला आहे.
भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले की, “जेव्हा रिंकुला मी नेटमध्ये फलंदाजी करताना पाहतो तेव्हा तो यशस्वी कसोटी फलंदाज होऊ शकतो असं वाटतं. त्याला डावलण्याचं कोणतंच तांत्रिक कारण सापडत नाही. जर त्याचा फर्स्ट क्लास रेकॉ्ड पाहिला तर त्याची सरासरी 50 इतकी आहे. तसेच त्याचा शांत स्वभाव त्याला कसोटीत उत्तम क्रिकेटपटू बनवू शकते.” वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपपर्यंत भारतीय संघ तीन मालिका खेळणार आहे. यात बांगलादेशविरुद्ध दोन सामने, न्यूझीलंड विरुद्ध तीन सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामने खेळणार आहे.
रिंकु सिंह आतापर्यंत 45 आयपीएल सामने, 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने आणि 2 वनडे सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचं अजूनही पदार्पण झालेलं नाही. त्याच्यातील क्षमता माजी बॅटिंग कोच विक्रम राठोड यांना दिसली असेल तर नक्कीच त्याचा विचार करणं गरजेचं आहे, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने रिंकुचा विचार केला जाऊ शकतो. दुसरीकडे, प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी तिन्ही फॉर्मेट खेळायला हवेत असं सांगितलं आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं तर आश्चर्य वाटायला नको.