टीम इंडियाकडून खेळलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रिकेटपटूने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. या क्रिकेपटूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑलराऊंडर असलेला हा क्रिकेटपटू पुण्याचा असून त्याने महाराष्ट्राच रणजीमध्ये प्रतिनिधीत्व केलं. भारताचा महान क्रिकेटपटू एमएस धोनी बरोबरही या क्रिकेटरचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भारतीय क्रिकेटमधुन नुकतीच निवृत्ती घेणारा केदार जाधव राजकारणात येणार आहे. भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव लवकरच राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार आहे. केदार जाधव याने भारतीय क्रिकेट मधुन निवृत्ती जाहीर केलेली आहे. आता तो राजकीय इनिंग ला सुरुवात करणार आहे.
“महाराष्ट्राच्या अन् देशाच्या हितासाठी मला राजकारणात यायला नक्कीच आवडेल” असं ठोस अन् मोठं वक्तव्य केदारने tv9 मराठीशी बोलताना केलं. तो माढ्यात बोलत होता. केदार जाधव क्रिकेटनंतर राजकीय इनिंग कशी पार पाडतो? कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेईल, हे पहावे लागणार आहे. “समाजासाठी काहीतरी करुन दाखवायची इच्छा असून राजकारणात यायला मला नक्कीच आवडेल” असं केदार जाधव म्हणाला.
राजकीय इनिंगसाठी तयार
“मी त्यासाठी वेळ द्यायला तयार आहे. मला सगळ्याच राजकीय पक्षांनी आपुलकीने वागवलं. माझ्याविषयी सगळ्यांना आदर आहे. येत्या काळात मी राजकीय इनिंगसाठी तयार असून संधी येईल तसा मी त्या पक्षासाठी सज्ज असेन” असं केदार जाधव म्हणाला. केदार जाधव माढा तालुक्यातील जाधववाडी या मूळ गावी आला होता. त्याने माढ्यातील माढेश्वरी देवीचे सहकुटूंब दर्शन घेतलं.
केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
केदार जाधवने 2014 साली श्रीलंका विरुद्ध वनडे मॅचमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. केदारने टीम इंडियाचं 73 वनडेमध्ये प्रतिनिधित्व केलं. केदारने या 73 सामन्यांमध्ये 101.60 च्या स्ट्राईक रेट आणि 42.09 सरासरीने 1 हजार 389 धावा केल्या. तसेच 27 विकेट्सही घेतल्या. तसेच 9 टी 20 सामन्यांमध्ये 122 धावा केल्या.