World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 मधून भारताची हजारो कोटींची कमाई, पैसाच पैसा

| Updated on: Sep 11, 2024 | 9:21 PM

Icc Odi World Cup 2023 : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं भारतातील 10 शहरांमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न अखेरच्या क्षणी भंग झालं. मात्र या वर्ल्ड कप आयोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला तगडा फायदा झाला आहे.

World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 मधून भारताची हजारो कोटींची कमाई, पैसाच पैसा
rohit sharma and pat cummins
Follow us on

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2023 मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विजय मिळवत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे भारताचं 12 वर्षांनी पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक दिली. मात्र टीम इंडिया वर्ल्ड कपपासून एक पाऊल दूरच राहिली. मात्र त्यानंतरही भारताला हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आयसीसीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 महिन्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार भारताला 11 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

45 दिवसांमध्ये 11 हजार 637 कोटी

आयसीसीने बुधवारी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. त्यानुसार, 45 दिवस चालेल्या या स्पर्धेतून भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळाला आहे. भारताला 1.39 बिलियन डॉलर अर्थात 11 हजार 637 कोटी रुपयांचा फायदा झालाय. हा फायदा 10 शहरांमुळे झाला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन हे भारतातील 10 शहरांमध्ये करण्यात आलं होतं. बीसीसीआय आणि आयसीसीने स्टेडियम दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. तसेच विविध शहरातील आयोजित सामन्यांमुळे पर्यटनालाही चालना मिळाली. अशा माध्यमातून हा फायदा झालाय.

पर्यटनातून सर्वाधिक कमाई

वर्ल्ड कप सामन्यांचं विविध शहरांमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. सामन्यानिमित्ताने आलेल्या क्रिकेट चाहत्यांनी आसपासच्या भागालाही भेट दिली. हॉटेल, खाणं-पिणं या सर्व माध्यमातून 7 हजार 222 कोटी रुपयांचा फायदा झाला. रिपोर्टनुसार, एकूण 12 कोटी लाख चाहत्यांनी वर्ल्ड कप स्पर्धा पाहिली, जे ऐतिहासिक होतं. यापैकी 75 टक्के चाहते हे पहिल्यांदाच वर्ल्ड कप सामने पाहायला आले. इतकंच नाही, तर 19 टक्के विदेशी क्रिकेट चाहते भारतात आले. तलेच वर्ल्ड कपमुळे विविध क्षेत्रात 48 हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या

दरम्यान या वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात झाली होती. सलामीचा आणि अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने भारतावर मात करत एकूण सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यात यश मिळवलं.