IND vs BAN : नितीश-रिंकूच्या स्फोटक बॅटिंगनंतर गोलंदाजांचा धमाका, टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकाही जिंकली

| Updated on: Oct 09, 2024 | 10:43 PM

India vs Bangladesh 2nd T20i Highlights In Marathi: टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवत 2024 या वर्षातील टी20i क्रिकेटमधील 20 वा विजय मिळवला आहे.

IND vs BAN : नितीश-रिंकूच्या स्फोटक बॅटिंगनंतर गोलंदाजांचा धमाका, टीम इंडियाचा बांगलादेशवर 86 धावांनी विजय, मालिकाही जिंकली
team india sanju suryakumar rinku singh
Image Credit source: bcci
Follow us on

टीम इंडियाने बांगलादेशवर दुसऱ्या टी20I सामन्यात 86 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशकडून अनुभवी महमुदुल्लाह याने सर्वाधिक 41 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त एकालाही भारतीय गोलंदाजांसमोर 20 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी प्रत्येकाने किमान 1 विकेट एकमेकांना अप्रतिम साथ दिली. टीम इंडियाचा हा सलग 20 वा टी 20i विजय ठरला. टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. तसेच भारताचा हा मायदेशातील सलग सातवा टी20i मालिका विजय ठरला आहे.

बांगलदेशची बॅटिंग

बांगलादेशकडून महमुदुल्लाह व्यतिरिक्त एकूण चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. परवेझ हुसेन इमॉन आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. लिटन दासने 14 धावा जोडल्या. तर कॅप्टन नजमुल शांतोने 11 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना भारतीय गोलंदाजांना झटपट मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाकडून पहिल्यांदाच 7 गोलंदाजांनी बॉलिंग केली आणि विकेटही घेतल्या. भारताकडून नितीश रेड्डी आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, मयंक यादव आणि रियान पराग या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. टीम इंडियासाठी नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर रिंकू सिंह याने 53 धावांचं योगदान दिलं. हार्दिक पंड्याने 32 धावांची भर घातली. अभिषेक शर्मा आणि रियान पराग या दोघांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. तर संजू सॅमसन याने 10 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना काही विशेष योगदान देता आलं नाही. बांगलादेशकडून रिशाद हौसैन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर तास्किन अहमद, तांझिम साकिब आणि मुस्तफिजुर या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया मालिकेत 2-0 ने आघाडीवर

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्लाह, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.