IND vs BAN 2nd Test : टीम इंडियाची कानपूरमधील आतापर्यंतची कामगिरी कशी? जाणून घ्या

| Updated on: Sep 25, 2024 | 11:05 PM

India vs Bangladesh 2nd Test : रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या सीरिजमधील दुसरा आणि अंतिम सामना हा कानपूर येथे होणार आहे.

IND vs BAN 2nd Test : टीम इंडियाची कानपूरमधील आतापर्यंतची कामगिरी कशी? जाणून घ्या
team india green park kanpur
Image Credit source: Bcci
Follow us on

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चौथ्याच दिवशी बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवला. लोकल बॉय आर अश्विन याने शतकी खेळीसह 6 विकेट्स घेतल्या. अश्विनच्या या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने हा धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याच्या तयारीत आहे. तर बांगलादेशमोर टीम इंडियाला रोखण्याचं आव्हान असणार आहे. आपण या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची कानपूरमधील आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे, हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाची कानपूरमधील कामगिरी

टीम इंडियाने कानपूरमध्ये 1952 पासून ते आतापर्यंत 23 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने या 23 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच भारताने 13 सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं आहे. भारत कानपूरमध्ये गेल्या 41 वर्षांपासून अजिंक्य राहिली आहे. भारताने कानपूरमध्ये अखेरीस 1983 साली विंडिज विरुद्ध कसोटी सामना गमावला होता. तेव्हापासून कोणताही संघ टीम इंडियाला पराभूत करु शकलेला नाही. त्यामुळे बांगलादेशसाठी खऱ्या अर्थाने कानपूरमध्ये ‘कसोटी’ असणार आहे.

कानपूरमधील अखेरचा सामना ड्रॉ

टीम इंडियाने कानपूरमध्ये अखेरचा कसोटी सामना हा नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. उभयसंघातील हा सामना अनिर्णित राहिला होता. आता 3 वर्षांनी होणाऱ्या या सामन्यात काय होतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.