रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिग्गज मुंबई संघाला बरोड्याकडून दे धक्का, 6 गुणांचं नुकसान

| Updated on: Oct 14, 2024 | 4:29 PM

रणजी ट्रॉफी 2024-25 स्पर्धेचं नवं पर्व सुरु झालं आहे. पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नुकतंच 27 वर्षानंतर मुंबईने इराणी चषकावर नाव कोरलं होतं. पण यंदाच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. बरोडाने मुंबईचा 84 धावांनी धुव्वा उडवला आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिग्गज मुंबई संघाला बरोड्याकडून दे धक्का, 6 गुणांचं नुकसान
Image Credit source: X@BCCIDomestic
Follow us on

रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत बरोडाचा संघ पहिल्याच सामन्यात मुंबईवर भारी पडला आहे. नाणेफेकीचा कौल बरोड्याच्या बाजूने लागला. बरोड्याचा कर्णधार कृणाल पांड्याने तात्काळ फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बरोड्याने 103.1 षटकांचा सामना केला. सुरुवातील बरोड्याचा संघ बॅकफूटवर गेला होता. मात्र त्यानंतर मधल्या फळीत जबरदस्त कमबॅक केलं आणि 10 गडी गमवून 290 धावा केल्या. विकेटकीपर मितेश पटेल आणि अतित शेठ यांनी जबरदस्त भागीदारी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. मितेश पटेलने 86 धावा, तर अतित शेठने 66 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग मुंबईचा संघ डगमगला. पृथ्वी शॉ काही खास करू शकला नाही. फक्त 7 धावा करून तंबूत परतला. आयुष म्हात्रे आणि हार्दिक तामोरेने चांगली खेळी. दुसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. आयुषने 52, तर हार्दिक तामोरेने 40 धावांची भागीदारी केली. ही जोडी बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव कोसळला. कर्णधार अजिंक्य राहणे 29 धावा करू शकला. तर श्रेयस अय्यरला आपलं खातंही खोलता आलं नाही. मुंबईला पहिल्या डावात फक्त 214 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे बरोड्याकडे पहिल्या डावात 76 धावांची आघाडी होती.

दुसऱ्या डावात कृणाल पांड्या आणि महेश पिठिया यांनी बरोड्याचा डाव सावरला. कृणाल पांड्याने 55, तर महेश पिठियाने 40 धावांची खेळी केली. तसेच पहिल्या डावात 76 धावांची आणि दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 185 धावा केल्या. यासह बरोड्याने 261 धावा केल्या आणि विजयासाठी 262 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही मुंबईला गाठला आलं नाही. सिद्धेश लाड वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. सिद्धेश लाडने 59 धावांची खेळी केली. तर संपूर्ण संघ 177 धावांवर बाद झाला. यासह बरोड्याने पहिल्या सामन्यात 84 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बरोड्याच्या खात्यात 6 गुण पडले आहेत. तर मुंबईची झोळी रिती असून नेट रनरेटवर परिणाम झाला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बरोड्याची प्लेइंग 11 : ज्योत्स्निल सिंग, शिवालिक शर्मा, शाश्वत रावत, विष्णू सोळंकी, क्रुणाल पंड्या (कर्णधार), मितेश पटेल (विकेटकीपर), राज लिंबानी, महेश पिठिया, अतित शेठ, अभिमन्यू सिंग राजपूत, भार्गव भट्ट.

मुंबईची प्लेइंग 11 : पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, हिमांशू वीर सिंग