ऋतुराज गायकवाडकडे अखेर कर्णधारपदाची धुरा, या संघाची मिळाली जबाबदारी

| Updated on: Jul 25, 2024 | 10:32 PM

झिम्बाब्वे दौऱ्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्सनंतर त्याला आणखी एक कर्णधारपद भूषवण्याची संधी आहे.

ऋतुराज गायकवाडकडे अखेर कर्णधारपदाची धुरा, या संघाची मिळाली जबाबदारी
Follow us on

ऋतुराज गायकवाडला जेव्हा कधी संधी मिळाली तेव्हा त्याने आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. एशियन्स गेम्समध्ये त्याच्याकडे टीम इंडियाची धुरा होती. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर त्याच्याकडे आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची धुरा सोपवण्यात आली. कर्णधारपदाच्या कार्यकाळात त्याने चांगली खेळी केली. आयपीएलमध्ये आक्रमक खेळी करत शतकही ठोकलं. असं असताना त्याची निवड टी20 वर्ल्डकप संघात झाली नाही. दुसरीकडे, झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला संघात स्थान मिळालं. त्याने या संधीचं सोनं केलं आणि चमकदार कामगिरी केली. पण श्रीलंका दौऱ्यातून त्याला वगळण्यात आलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी होती. पण त्याच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ऋतुराज गायकवाडला महाराष्ट्र क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफी 2024-2025 सालासाठी कर्णधार केलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने याची घोषणा केली आहे. या संघात अर्शीन कुलकर्णी आणि राहुल त्रिपाठीही आहे. रणजी ट्रॉफीत महाराष्ट्राचा पहिला सामना जम्मू आणि काश्मीरशी आहे. हा सामना 11 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर मुंबईसोबत 18 ऑक्टोबरला सामना असेल.

ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्राकडून खेळतो. पण पुढच्या रणजी ट्रॉफीत त्याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. ऋतुराजने 29 फर्स्ट क्लास सामन्यात 2041 धावा केल्या आहेत. यात 6 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच लिस्ट एच्या 77 सामन्यात 4130 धावा आहेत. यात 15 शतकं आणि 17 अर्धशतकं आहे. तसेच द्विशतकही ठोकलं आहे. ऋतुराज गायकवाडने टीम इंडियासाठी 23 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने 633 धावा केल्या आहेत. तर 6 वनडे सामने खेळला आहे. ऋतुराज सध्या चांगल्या फॉर्मात आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात त्याने नाबाद 77 आणि एका सामन्यात 49 धावांची खेळी केली होती.

ऋतुराज गायकवाची वर्णी केदार जाधवच्या जागी झाली आहे. काही दिवसांपूर्वी केदार जाधवने निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीत कर्णधारपद कोणाकडे सोपवायचं हा प्रश्न होता. ऋतुराजपेक्षा चांगला पर्याय शोधून सापडला नसता. त्यामुळे कर्णधारपदाची माळ त्याच्या गळ्यात घातली. आता टीम इंडियातून डावलल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचा लक्ष लागून आहे.