SL vs IND: झिंबाब्वे सीरिजमधील ‘या’ खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यातून डच्चू! कुणाला संधी?
India Tour Of Sri Lanka 2024: झिंबाब्वे दौरा फत्ते केल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेसाठी झेप घेणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे.
टीम इंडियाच्या युवा ब्रिगडने दिग्गजांशिवाय आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत झिंबाब्वे विरुद्ध मैदान मारलं. शुबमन गिल याच्या नेतृत्वात परभवाने सुरुवात झाल्यानंतर टीम इंडियाने सलग 4 सामने जिंकून विजयी चौकार लगावला. टीम इंडियाने अशापक्रारे 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतून अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली. तसेच साऱ्या क्रिकेट विश्वाला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भाग पाडलं. झिंबाब्वे दौरा फत्ते केल्यानंतर टीम इंडियासमोर मिशन श्रीलंका आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी झिंबाब्वे दौऱ्यातील काही खेळाडूंना डच्चू मिळणार असल्याचं निश्चित आहे.
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात ही 27 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यातील टी 20 आणि वनडे सीरिजसाठी काही खेळाडूंचं कमबॅक होऊ शकतं. तर साहजिक अगदीच युवा खेळाडूंना निवड समिती डच्चू देऊ शकते. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समिती पुढील काही दिवसात कधीही घोषणा करु शकते.
झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेतून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंनी टी 20I पदार्पण केलं. या मालिकेत अगदीच 1-2 खेळाडूंचा अपवाद वगळला, तर सर्वच नवखे होते. मात्र आता श्रीलंका विरूद्धच्या दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंची फौज परतणार असल्याने युवा खेळाडूंना पुन्हा संधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तसेच कॅप्टन्सीची धुरा कुणाकडे असणार? असाही प्रश्न क्रिकेट चाहत्यांना आहे.
रोहित शर्मा याने टी 20 वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधील सर्वात छोट्या प्रकारातून निवृत्ती घेतली. तर रोहित श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकेत कुणाला कर्णधारपदाची जबाबदारी द्यायची, असा प्रश्नही निवड समितीपुढे असणार आहे. मात्र हार्दिक पंड्याला टी 20 मालिकेसाठी कर्णधार केलं जाऊ शकतं. तसेच केएल राहुल याला वनडे सीरिजसाठी कॅप्टन म्हणून जबाबदारी देण्यात येऊ शकते.
कुणाला संधी कुणाला डच्चू?
दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात श्रेयस अय्यर याचं कमबॅक होऊ शकतं. तसेच टी 20 वर्ल्ड कपनंतर टीममध्ये सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांचं पुनरागमन होऊ शकतं. तसेच झिंबाब्वे दौऱ्यावर गेलेल्या अभिषेक शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि तुषार देशपांडे यांना पुढील संधीची वाट पाहावी लागू शकते. अशात आता निवड समिती काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष लागून आहे.