प्रत्येक सामन्यागणिक भारतीय संघ यशाचा नवीन अध्याय लिहितोय. श्रीलंकेला नमवून काल भारताने टी-20 क्रिकेटमध्ये मालिका विजयाची हॅट्रिक केली. युवा खेळाडू दमदार प्रदर्शन करत आहेत. पण रोहित शर्माच्या (Rohit sharma) फॉर्मवर नजर टाकल्यास चिंता थोडी वाढते.
यश मिळतय म्हणून कमकुवत दुव्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. रोहित शर्माचा सध्याचा फॉर्म त्याच कमजोरीचा एक भाग आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात भारतीय संघाची चिंता वाढू शकते. जर असंच सुरु राहिलं, तर वर्ल्डकप कसा जिंकणार? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला. पण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो.
एक-दोन खेळाडूंच्या बळावर प्रत्येक वेळी तुम्ही सामना जिंकू शकत नाही. रोहित शर्माला टी 20 साठी जी दमदार टीम बनवायची आहे, त्यामध्ये त्याच्या फलंदाजीची भूमिका सुद्धा महत्त्वाची राहणार आहे.
टी 20 इंटरनॅशनलमधील मागच्या सहा डावातील रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, त्याने सहा डावात त्याने फक्त 123 धावा केल्या आहेत. सहाडावात दोन वेळा तो एक आकडी धावसंख्येवरच तंबूत परतला आहे.
रोहितची सर्वात मोठी खेळी 44 धावांची आहे. अर्धशतकापासून रोहित अजूनही लांब आहे. त्यामुळे टी 20 मध्ये भारताला विश्वविजेते बनायचं असेल, तर रोहितची बॅट तळपण तितकच आवश्यक आहे.
मागच्या सहा डावातील रोहितचे धावांचे आकडे पाहून त्याच्या फॉर्मची स्थिती तुमच्या लक्षात आली असेल. रोहितचे अन्य काही आकडे पाहिल्यानंतर हा हिटमॅनच आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल.
टी 20 मध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळताना रोहित आतापर्यंत 40 वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. विराट कोहली 16 वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे.
टी 20 वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी रोहितच्या बॅटमधून धावा निघणं खूप आवश्यक आहे.
कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड चांगला आहे. पण फलंदाज म्हणून त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल.