मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीमध्ये नेमकं काय सुरु आहे? कर्णधारपदाच्या त्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये अस्वस्थता

| Updated on: Aug 03, 2024 | 8:45 PM

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी आतापासून खलबतं सुरु झाली आहे. दिग्गज खेळाडू संघात असलेल्या फ्रेंचायझींना घाम फुटला आहे. कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला रिलीज करायचा असा प्रश्न आहे. असं असताना मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीमध्ये नेमकं काय सुरु आहे? कर्णधारपदाच्या त्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये अस्वस्थता
Follow us on

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मेगा लिलावासाठी बीसीसीआय आणि फ्रेंचायझींमध्ये चर्चा सुरु आहे. या बैठकीत विदेशी खेळाडू, रिटेनशन आणि इम्पॅक्ट प्लेयर या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी फ्रेंचायझींनी आपली मतं मांडली. काही जणांचा होकार, तर काही जणांचा नकार अशी ही चर्चा रंगली. त्यामुळे बीसीसीआय सर्वांची मत जाणून मधला मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे. असं असताना मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक काही बातम्या समोर येत आहे. या बातम्यांमध्ये सध्या तरी काही तथ्य नसलं तरी अस्वस्थता वाढवणारी आहे. रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याला रिलीज करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे मेगा लिलावात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. खरं तर मुंबई इंडियन्सने 2024 स्पर्धेपूर्वी हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात घेतलं होतं. तसेच कर्णधारपद सोपवलं होतं. मात्र त्याच्या कारकिर्दित मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली. इतकंच काय तर प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात अपयश आलं. असं असताना मुंबई इंडियन्स फ्रेंचायसी हार्दिक पांड्याला रिलीज करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हार्दिकच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

आयपीएलच्या नियमानुसार, दर तीन वर्षांनी मेगा लिलाव पार पडतो. यात प्रत्येक संघाला फक्त चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडू असलेल्या संघांचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे, यावेळी रिटेशनची संख्या वाढवणार असल्याची चर्चा रंगली आहे.यावेळी चार ऐवजी पाच खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळू शकते. पण याबाबत बीसीसीआयने अधिकृतरित्या काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे संघात कोणाला ठेवायचं आणि कोणाला रिलीज करायचं हा प्रश्न कायम आहे.

मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराहला कोणत्याही परिस्थिती संघात ठेवणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हार्दिक पांड्याला रिलीज करण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व सोपवल्यास रोहित शर्मा त्याच्या हाताखाली आरामात खेळू शकतो. त्यामुळे आता या चर्चा चर्चाच राहतात की सत्यात उतरतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. मेगा लिलावापूर्वी सर्वकाही स्पष्ट होईल.