मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरला घेण्याचं कारण काय? जयवर्धने-हार्दिक पांड्याने केला खुलासा
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. मुख्य खेळाडूंना रिटेन केल्यानंतर मेगा लिलावात अनुभवी खेळाडूंवर डाव लावला. दुसरीकडे, मुंबईने मार्क बाउचरच्या जागी महेला जयवर्धनेकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. असं असताना ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरला संघात घेण्याचं कारण काय? ते जयवर्धने आणि हार्दिक पांड्याने सांगितलं आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे मागच्या पर्वातील संपूर्ण नियोजनावरच क्रीडाप्रेमींना नाराजी व्यक्त केली होती. दिग्गज खेळाडू असूनही संघाची अशी स्थिती पाहून आश्चर्य व्यक्त होत होतं. पण या पर्वात मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. फ्रेंचायझीने मुख्य प्रशिक्षक बदलला, तसेच काही अनुभवी खेळाडूंना संघात सहभागी केलं आहे. मुंबई इंडियन्सने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मार्क बाउचरकडून महेला जयवर्धनेकडे सोपवली आहे. जयवर्धनने यापूर्वी जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरीकडे, डावखुरा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टचं संघात पुनरागमन झालं आहे. इतकंच काय तर सर्वांना धक्का देत चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज दीपक चाहरला आपल्या संघात घेतलं आहे. जसप्रीत बुमराहसह बोल्ट आणि चाहर आल्याने मुंबईच्या गोलंदाजीला धार चढली आहे. बोल्ट आणि चाहरची निवड कशी करण्यात आली? याचा खुलासा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने केला आहे.
कर्णधार हार्दिक पांड्या आणि महेला जयवर्धने यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, मॅनेजमेंट ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर या दोघांना संघात सहभागी करण्यासाठी इच्छुक होते. यामुळे मुंबईकडे अनुभवी गोलंदाजांचं लाइनअप असेल. तसेच सामन्यात दबाब झेलू शकतील. दरम्यान, आयपीएल मेगा लिलावत मुंबईने बोल्टसाठी 12.5 कोटी रुपये मोजले. तर दीपक चाहरला संघात घेण्यासाठी मेगा लिलावात 9.25 कोटी दिले. कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितलं की, ‘ट्रेंट बोल्टला घेणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. दीपक चाहर सुद्धा.. आम्हाला एक अनुभवी गोलंदाजी लाइनअप हवा होता. जेव्हा दबाव येईल तेव्हा आमच्याकडे ते सहन करण्याची ताकद असलेले खेळाडू असायला हवेत.’
महेला जयवर्धनेने सांगितलं की, ‘मागच्या पर्वात अडचणींचा सामना करावा लागला. पण यावेळेस मेगा लिलाव पार पडला आणि आमच्याकडे एक नवा कॅनव्हास आहे. आमची मुख्य टीम आणि नवे खेळाडू यांचा चमू आहे. यात आता ट्रेंट बोल्टचं पुनरागमन आहे.’ मागच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त चार सामन्यात विजय मिळवला. पण मेगा लिलावात हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवलं आणि इतर खेळाडूंना रिलीज केलं. तर इतर खेळाडूंसह नव्याने संघ बांधला आहे. मुंबई इंडियन्सने शेवटचं जेतेपद 2020 मध्ये जिंकलं होतं.