हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचं काही खरं नाही! गौतम गंभीरची पसंती नेमकी कोणाला?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा पार पडला. या दौऱ्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी करत आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार कोण असेल? याची चर्चा रंगली आहे.
भारतीय संघ 27 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीचा संघ अजून जाहीर झालेला नाही. पण संघात कोण असेल कोण नसेल याची खलबतं आतापासूनच सुरु झाली आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे कर्णधारपदी कोण असेल याची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या कर्णधारपदी असेल असशी सांगितलं जात आहे. पण हार्दिक पांड्यासाठी ही शर्यत वाटते तितकी सोपी नाही. श्रीलंका दौऱ्यासाठीचा संघ या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे संघात कोण असेल आणि कर्णधारपदाची माळ कोणाच्य गळ्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण हार्दिक पांड्या शर्यतीत आघाडीवर असला तरी त्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर सोडला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 हे लक्ष्य ठेवूनच संघाची बांधणी केली जाईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, याबाबत लवकरच गंभीर आणि मुख्य निवडसमिती चर्चा करणार आहे.
श्रीलंका दौऱ्यात टी20 मालिकेनंतर वनडे मालिका आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा देखील प्रश्न आहे. वनडेसाठी केएल राहुल याचं नाव चर्चेत आहे. पण याबाबतही काहीच स्पष्ट नाही. इनसाइट स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘आतापर्यंत काहीच निश्चित नाही. टीम इंडियासाठी एक जमेची बाजू अशी आहे की खूप सारे पर्याय आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात तीन आयपीएल कर्णधार होते. श्रीलंका दौऱ्यातही अशीच नावं असतील. रोहितच्या गैरहजेरीत योग्य कर्णधार निवडणं गरजेचं आहे.’
दरम्यान, श्रेयस अय्यरची वनडे संघात पुनरामगन होऊ शकतं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत त्याने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली होती. आयपीएल स्पर्धेत गौतम गंभीर मेंटॉर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्यामुळे या दोघांचं ट्युनिंग चांगलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वनडे संघाची धुरा प्रशिक्षक गौतम गंभीरने श्रेयस अय्यरच्या खांद्यावर टाकली तर आश्चर्य वाटायला नको. श्रेयस अय्यरला टी20 वर्ल्डकप संघात निवडलं नव्हतं. तर झिम्बाब्वे दौऱ्यातूनही डावललं होतं. त्यामुळे आता संघात निवड होईल की नाही इथपासून सुरुवात आहे.