वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणं भारतासाठी कठीण! झालं असं की…

| Updated on: Aug 06, 2024 | 4:40 PM

भारताने टी20 वर्ल्डकप जिंकल्यापासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याचे वेध लागले आहेत. चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानात होणार असल्याने अजूनतरी साशंकता आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचंही काही खरं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना चिंता लागून राहिली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणं भारतासाठी कठीण! झालं असं की...
Follow us on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या वर्षाच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार अशी क्रीडाप्रेमींना आस आहे. भारतीय संघाला अंतिम सामना गाठण्यासाठी तीन मालिका पार पडाव्या लागणार आहेत. या तीन पैकी दोन मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला की अंतिम फेरीचं तिकीट पक्कं होणार आहे. पण भारताच्या या स्वप्नावर विरजन पडू शकतं. त्याचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये उद्भवलेली तणावपूर्ण स्थिती…भारतीय संघ पुढील तीन कसोटी मालिकांमध्ये बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे. भारतीय संघ बांग्लादेशसोबत दोन सामन्यांची, न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ भारतात येणार आहेत. पण बांगलादेशमधील स्थिती पाहता संघ भारतात येईल की नाही याबाबत साशंकता आहे. सद्यस्थिती पाहता, बांगलादेशमध्ये आयोजित केलेला आयसीसी महिला टी20 वर्ल्डकप स्थगित करण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत बांग्लादेश संघ भारतात येईल की नाही याबाबत शंका आहे.

बांगलादेशची सध्याची स्थिती खूपच वाईट असल्याने पंतप्रधान शेख हसीना यांनी पळ काढला आहे. इतकंच काय तर भारताच्या आश्रयात आल्या आहेत. त्यामुळे तिथली परिस्थिती किती चिघळली आहे याचा अंदाज येतो. त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होणार यात शंका नाही. दुसरीकडे, त्याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी बांगलादेशचं सोपं आव्हान होतं. अशात ही मालिकाच झाली नाही, तर भारताचं कठीण होईल. भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 ते 23 सप्टेंबर, दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा असणार आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका रद्द करण्याची वेळ आली तर भारताचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कस लागेल. इतकंच काय तर गणित चुकलं तर अंतिम फेरीच्या आशा देखील मावळतील. त्यात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. भारताची ऑस्ट्रेलियातील कामगिरी तितकी काही चांगली नाही. जर भारताचं गणित चुकलं तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेला संधी मिळू शकते.