Photo | IND vs AUS : सिडनी वनडेमध्ये या पाच कारणांमुळे भारताचा पराभव, कांगारुंची दादागिरी!
Akshay Adhav |
Updated on: Nov 28, 2020 | 11:03 AM
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये शुक्रवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 66 धावांनी पराभूत केलं. पराभवानंतर भारताच्या पराजयाची कारणं समोर आली आहेत. त्यातलं पहिलं महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे पहिल्या 10 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला बाद करणं भारतीय बोलर्सला जमलं नाही.
या सामन्यात भारतीय संघ 5 बोलर्ससोबत मैदानात उतरला. निर्धारित 50 षटकं याच 5 बोलर्सला टाकावी लागली. संघात असा कुणी ऑलराऊंड प्लेअर नव्हता की जो सहाव्या गोलंदाजाची कमी भरुन काढेल. शुक्रवारी सहाव्या गोलंदाजाची कमी भारतीय संघाला प्रकर्षाने जाणवली.
ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम बॅटिंग करताना अतिशय तगडी बॅटिंग केली. याच दरम्यान भारतीय संघाची फिल्डिंग म्हणावी अशी झाली नाही. भारतीय संघाच्या फिल्डर्सकडून अनेकवेळा मिस फिल्ड झाल्याचं पाहायला मिळालं. धवनने स्मिथचा कॅच सोडला. त्याच स्मिथने सामन्यात आक्रमक शतक झळकावलं. हार्दिक पांड्याने ग्लेन मॅक्सवेलचा कॅच सोडला. त्याच मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 रन्स ठोकले. या दोघा बॅट्समनने मॅचचा अंदाजच बदलून टाकला.
भारतीय फलंदाजांना शॉर्ट बॉलचा सामना करणं अवघड गेलं. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डर बॅट्समनना शॉर्ट बॉलचा अंदाज आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूडने भारतीय संघाची हीच कमी ओळखून सुरुवातीच्या तीन विकेट्स मिळवल्या. मयांक अग्रवाल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर शॉर्ट बॉलवर आऊट झाले.
मोठी भागीदारी करण्यात भारतीय फलंदाजांना अपयश आलं. पहिल्या पाच ओव्हरमध्ये भारतीय संघाच्या 50 धावा धावफलकावर लागल्या होत्या. मात्र नंतर ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. सरतशेवटी भारताला 66 रन्सनी पराभव स्वीकारावा लागला.