आधार कार्डची कटकट संपणार, आता QR स्कॅनवर चुटकीत काम पार पडणार!
कुठेही जा, काहीही करा... ओळखपत्र म्हणून आधार कार्डची गरज पडतेच! सतत ते सोबत ठेवा, जपून वापरा, नाहीतर त्याची झेरॉक्स कॉपी द्या... या कटकटीला तुम्हीही कंटाळला आहात का? मग तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे! आता खिशात आधार कार्ड घेऊन फिरायचे दिवस लवकरच संपणार आहेत. कारण सरकार एक असं नवीन ॲप आणतंय, जिथे तुम्ही फक्त QR कोड स्कॅन कराल आणि तुमचं आधार व्हेरिफिकेशन क्षणात होईल!

आपल्या दैनंदिन जीवनात कुठेही ओळख दाखवायची झाली की सर्वप्रथम आठवतं ते आपलं ‘आधार कार्ड’. मग ते हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन असो, बँकेतील अकाउंट ओपनिंग असो किंवा परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना असो आधार कार्ड दाखवणे किंवा त्याची झेरॉक्स कॉपी द्यावी लागतेच. मात्र, ही रोजची कटकट आता लवकरच संपण्याची चिन्हं आहेत. भारत सरकार आणि आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI मिळून एक नवीन, अत्यंत सोपं डिजिटल आधार ॲप आणण्याच्या तयारीत आहेत.
या नवीन ॲपमुळे काय होणार?
तुम्हाला ओळख पडताळणीसाठी खिशात आधार कार्ड घेऊन फिरायची किंवा त्याची फोटोकॉपी काढून देण्याची गरजच उरणार नाही.
विचार करा, जसं आपण दुकानात UPI ने पेमेंट करण्यासाठी फक्त QR कोड स्कॅन करतो, अगदी तसंच तुमची ओळख पटवण्यासाठी फक्त मोबाईलमधील या नवीन ॲपमधून एक QR कोड स्कॅन करायचा… आणि तुमचं काम झालं!
हे नवीन ॲप कसं काम करणार?
1. तुमच्या मोबाईलमध्ये हे नवीन ॲप उघडायचं.
2. जिथे तुम्हाला ओळख पटवायची आहे (उदा. हॉस्पिटल, परीक्षा केंद्र, बँक), तिथल्या अधिकाऱ्याकडील किंवा काउंटरवरील QR कोड तुमच्या ॲपमधून स्कॅन करायचा.
3. स्कॅन होताच तुमची ओळख (नाव, फोटो इत्यादी गरजेची माहिती) अधिकृतरित्या व्हेरिफाय होईल.
या नवीन आधार ॲपचे फायदे काय असतील?
तुमच्या आधार कार्डच्या कॉपीचा कोणी गैरवापर करू शकणार नाही, त्यामुळे तुमची ओळख अधिक सुरक्षित राहील.
तुमची आधार माहिती (नंबर इत्यादी) तुम्हाला कोणासोबत शेअर करण्याची गरज नसल्याने तुमची प्रायव्हसी जपली जाईल.
हॉटेलमध्ये चेक-इन करताना, बँकेत किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आता आधार कार्डची झेरॉक्स कॉपी देण्याची गरज भासणार नाही.
QR कोड स्कॅनमुळे ओळख पडताळणीची प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होईल. ही पद्धत वेगवान, सोपी आणि अधिक सुरक्षित असेल.
स्मार्टफोन वापरणारा कोणताही नागरिक, मग तो गावातला असो वा शहरातला, हे ॲप सहज वापरू शकेल, ज्यामुळे डिजिटल इंडिया मोहिमेला आणखी गती मिळेल.