बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा या गावात ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 5 हजार वस्ती असलेल्या मलकापूर पांग्रा या गावात महिला सरपंच असून सुद्धा महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कडक उन्हाळा असल्याने 5 किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे, पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे 20 ते 25 दिवस पाणी पुरवठा केल्या जात नसल्याने त्रस्त ग्रामस्थानी हातात हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. महिलांचा उद्रेक पाहून ग्रामसेवक, सरपंच पळून गेले, शेवटी ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले .जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय.