केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
लोकसभा निवडणूकीमुळे कांद्यावर निर्यात बंदी लादण्यात आली होती. आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविली असली तरी साडे पाचशे डॉलर मे. टन शुल्क आणि 40 टक्के निर्यात शुल्क लादले आहे.सरकारने जर निर्यात शुल्क कमी केले तर कांदे व्यापाऱ्यांना परकीय बाजारपेठ उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे.
केंद्र सरकारने लोकसभा निवडणूकांच्या निमित्ताने कांद्यावर निर्यात बंदी लादल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या निर्णयाने कांद्याच्या परदेशी बाजारपेठेला शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. या निर्याद बंदीच्या विरोधात विरोधी पक्षांनी खूप आवाज उठविला होता. आपल्या देशातील कांदा निर्यात बंदीने पाकिस्तानातल्या कांद्याला युरोप आणि इतर देशांचे मार्केट खुले झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केला होता. अखेर लोकसभा निवडणूकानंतर कांद्यावरील निर्यात बंदी उठविली असली तरी सरकारने अनेक नियम लादल्याने शेतकऱ्यांना कांद्याची निर्यात करुन नफा मिळविण्याचे मार्ग कमी झाले आहेत. या बाबत नाफेडने दिलेल्या माहितीनूसार या आर्थिक वर्षात 2023-24 आठ लाख आठ हजार मे.टन कांदा निर्यात कमी झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 17 लाख 17 हजार मे.टन कांदा निर्यात झाला होता. साल 2022-23 मध्ये 25 लाख 25 हजार टन इतकी कांदा निर्यात झाली होती. त्यामुळे सरकारला केंद्र सरकारला साडे तीन हजार कोटीचा फायदा झाला होता. आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविली असली तरी साडे पाचशे डॉलर मे. टन शुल्क आणि 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने जर निर्यात शुल्क कमी केले तर कांदे व्यापाऱ्यांना परकीय बाजारपेठ उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे.