शिंदे सरकारचा योगी पॅटर्न, चुकीला माफी नाही…बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षयचा गेम ओव्हर?

Akshay Shinde Encounter: अखेर घटनेच्या दीड महिन्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला. त्यानंतर बदलापूरमध्ये फटके फोडले गेले. पेढे वाटले गेले अन् सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली शिंदे सरकारच्या योगी पॅटर्नची... स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी शिंदे सरकारने हे ठरवून केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

शिंदे सरकारचा योगी पॅटर्न, चुकीला माफी नाही...बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षयचा गेम ओव्हर?
अक्षय शिंदे
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 2:13 PM

दीड महिन्यापूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. अक्षय शिंदे नावाच्या आरोपीने केलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. बदलापूरकर प्रचंड संतप्त झाले होते. तब्बल दहा तास लोकांनी रेल्वे रोखून आंदोलन केले होते. जनतेची एकच मागणी होती. आरोपीला जाहीर फाशी द्या… सरकारच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा चर्चा केली. परंतु लोक आपल्या मागणीवर ठाम होते. सरकारकडून वेगाने पावले उचलत एसआयटीची स्थापना करण्यात आली. जलदगती न्यायालयाची निर्मिती करण्यात आली. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे दिला. त्यानंतर जनतेचे समाधान झाले नाही. लोकांनी जाहीर फाशीची मागणी लावून धरली होती.

अखेर दीड महिन्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला. त्यानंतर बदलापूरमध्ये फटके फोडले गेले. पेढे वाटले गेले अन् सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली शिंदे सरकारच्या योगी पॅटर्नची…स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी शिंदे सरकारने हे ठरवून केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. महिला अत्याचार प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आरोपींवर गोळीबार झाल्याचे बरेच प्रकार यापूर्वी घडले आहेत. पोलीस कस्टडीमध्ये असताना या आरोपींनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवल्याच्या अनेक घटना समोर आल्या. उत्तर प्रदेशमधल्या या घटनांचा उल्लेख योगी पॅटर्न केला जातो. त्याचा संदर्भ घेत शिंदे सरकारचा योगी पॅटर्न अशी चर्चा सुरु झाली.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशात 207 आरोपींचे एन्काऊंटर

सोशल मीडियावर शिंदे सरकारच्या या एन्काऊंटरची तुलना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारशी केली जात आहे. योगी आदित्यनाथ सरकारने 2017 ते 2024 दरम्यान 207 आरोपींचे एन्काऊंटर केले. यामध्ये 17 पोलीस कर्मचारी शहीद झाले. परंतु गुन्हेगारांमध्ये योगी सरकारची दहशत निर्माण झाली. महाराष्ट्रात अक्षय शिंदे याच्या झालेल्या एन्काऊंटरमुळे सोशल मीडियावर अनेक युजरकडून आनंद व्यक्त केला गेला. एका युजरने थेट म्हटले ‘सुनियोजित कार्यक्रम..मोठे गुन्हेगार बाहेर येऊ नाही म्हणून असे एन्काऊंटर…महाराष्ट्रचे यूपी केले…’ परंतु विरोधक आणि अक्षय शिंदे यांचे आई-वडील या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

देशातील हे एन्काऊंटर गाजले

थोडे मागे गेल्यावर अत्याचार प्रकरणातील आरोपींवर विविध राज्य सरकारकडून एन्काऊंटरची कारवाई झाल्याचे दिसून येते. सरकार जनभावनेसोबत गेल्याचे या प्रकरणांमध्ये दिसते. 2019 मध्ये तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झाला होता. त्यानंतर त्या महिलेची हत्याही आरोपींनी केली होती. या प्रकरणी अटकेत असलेल्या चार नराधमांचे हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. अर्थात त्यानंतर संपूर्ण देश पोलिसांच्या बाजूने उभा राहिला. त्यानंतर 2024 मध्ये आसाममध्ये 19 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचा आरोप असलेल्या आरोपीचे एन्काऊंटर झाले. 2024 मध्ये आग्रा येथे ज्येष्ठ महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीचाही पोलीस चकमकीत मृत्यू झाला.

चकमक झाली तरी कशी

  1. अक्षय याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार केली होती. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी (23 सप्टेंबर) तळोजा कारागृहात पोहचले.
  2. सायंकाळी 6.15 वाजता पोलिसांच्या वाहनातून अक्षयला नेले जात होते. मुंब्रा बाह्यवळणावर अक्षयने वाहनात शेजारी बसलेल्या पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिकसवली. त्यानंतर तीन राउंड फायर केले. यामध्ये मोरे जखमी झाले.
  3. अचानक घडलेल्या या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली.
  4. अक्षय शिंदेचा खात्मा या गोळीनेच झाला. त्याला कळवा मनपाच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.

अक्षय शिंदे प्रकरणाची सुरुवात अन् शेवट

  • 12 व 13 ऑगस्ट रोजी बदलापुरातील शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली.
  • 16 ऑगस्ट- बदलापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला.
  • 17 ऑगस्ट- सकाळी लवकर शाळेतून आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांकडून अटक
  • 20 ऑगस्ट- दहा तास रेल्वे रोखून बदलापूरकरांनी केले आंदोलन. हे आंदोलन जवळपास दहा तास चालले.
  • 20 ऑगस्ट- आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची लोकांनी तोडफोड केली.
  • 21 ऑगस्ट- एसआयटीकडून चौकशी सुरू होताच शाळेचे विश्वस्त आणि मुख्याध्यापिका फरार
  • 26 ऑगस्ट- अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • 1 सप्टेंबर- पीडित मुलींसमोर नराधम अक्षय शिंदे याची ओळख परेड
  • 8 सप्टेंबर- अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहात मुक्काम
  • 19 सप्टेंबर- अक्षय शिंदेवर कल्याण न्यायालयात आरोपपत्र
  • 23 सप्टेंबर- पोलीस चकमकीत आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू, बदलापुरात पेढे वाटून आनंद

असे उघड झाले हे प्रकरण

अक्षय शिंदे हा बदलापुरातील शाळेत 1 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाला होता. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी त्याने चार वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार केले. या दोन्ही मुली अक्षयला ‘दादा’ म्हणत होते. त्या मुलींना घरी गेल्यावर वेदना होऊ लागल्या. त्यावेळी त्यांच्या आईने चौकशी केली. त्यानंतर त्या दादाने काय प्रकार केला? ते आईला सांगितले. त्या मुलींची वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यांच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

अक्षयचा खात्मा करणारे संजय शिंदे कोण?

अक्षय शिंदे याचा खात्मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या गोळीने झाला. संजय शिंदे यांची कारकीर्द बरीच चर्चेत राहिली आहे. त्यांनी आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. प्रदीप शर्मा यांनी 100 हून जास्त गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहे. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचा समावेश होता. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी टीममध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता. गँगस्टर विजय पालंडे पोलिसांच्या कैदेतून पळून गेल्याच्या प्रकरणात संजय शिंदे यांचे नाव समोर आले होते. संजय शिंदे यांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

न्यायालयीन चौकशीतून सत्य बाहेर येणार- उज्ज्वल निकम

जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, पोलीस कोठडीत असताना आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. त्याच्या विरोधात दोन आरोपपत्र दाखल केले गेले होते. या कागदपत्रांचे वाचन केल्यावर त्याच्याविरोधात भरपूर पुरावा जमा झाल्याचे दिसले. न्यायालयात दोन लहान बालिकांनीही त्याला ओळखले होते. यामुळे आरोपी नैराश्यात आला होता. या प्रकरणात आरोपीला घेऊन जाताना पोलिसांनी निश्चितच काळजी घेतली असणार आहे. आता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल. त्यानंतर सत्य बाहेर येईल. आता हे एन्काऊंटर आहे की काय? हे सर्व न्यायालयीन चौकशीतून बाहेर येणार आहे.

महाराष्ट्रातील पहिले एन्काऊंटर कधी झाले…

महाराष्ट्रात पहिले एन्काऊंटर 1966 मध्ये झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात हे एन्काऊंटर झाले. किसन सावजी या आरोपीचे 29 जानेवारी 1966 रोजी एन्काऊंटर झाले होते. तत्कालीन पोलीस उपअधिक्षक वसंत गि.ढुमणे यांनी हे एन्काऊंटर केले होते. त्यानंतर वसंत गि. ढुमणे प्रचंड चर्चेत आले. या एन्काऊंटरचा उल्लेख ढुमणे यांनी लिहिलेल्या पुस्तकात केला आहे. त्यातही हे राज्यातील पहिले एन्काऊंटर असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर 1980 व 1990 च्या दशकात विशेषतः मुंबईत शेकडो एन्काऊंटर झाले. त्यामुळे मुंबईतील गँगवार संपुष्टात आली. दाऊद टोळी आणि गवळी टोळी नामेशष झाली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रदीप शर्मा, दया नायक, अफताब अहमद खान, विजय साळसकर, राम जाधव, सचिन वझे, परमबीर सिंह, प्रदीप सावंत, भानूप्रताप बर्गी, असलम मोमीन यांचे नाव चर्चेत आले होते. दगडी चाळ या चित्रपटात अरुण गवळीची भूमिका साकारणारा कलाकार म्हणतो, चुकीला माफी नाही… तिच भावना गुन्हेगारांबाबत जनतेची आहे.

जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट.
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?.
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?.
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं...
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं....
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला...
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला....